रुग्णवाहिका न मिळाल्याने मृतदेह खाटेला बांधून दुचाकीवरुन घेऊन जावा लागला आहे.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्हातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे येथील आरोग्य व्यवस्था किती निर्लज झाली आहे हे यावरून लक्षात येते. येथील भामरागड तालुक्यातील दुर्गम कृष्णार येथील गणेश लामी वय 23 वर्ष युवकाचा क्षयरोगामुळे मृत्यू झाल्याने आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. 17 जुलै रोजी गणेशला गंभीर अवस्थेत हेमलकसा येथे भरती करण्यात आले होते. 20 जुलैला उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृ्त्यूनंतर वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने मृतदेह दुचाकीवर खाटेला बांधून गावी नेण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
देशात क्षयरोग निर्मूलनासाठी विशेष मोहीम चालवण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष विभाग कार्यरत असतो. निदान झाल्यानंतर रुग्णाला नियमित औषधोपचार देणे, वेळोवळी आरोग्य सेवकांच्या माध्यमातून त्याची देखरेख करणे, यासाठी सरकारकडून कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात येतो. मात्र, गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात आरोग्य विभागाच्या दुर्लक्ष मुळे गणेश तेलामी याला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य विभागाच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, मृत्यूनंतर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने गणेशचा मृतदेह दुचाकीवर खाटेला बांधून गावात आणण्यात आला. हा प्रकार लक्षात येताच खळबडून जागे झालेल्या प्रशासनाने शववाहिका पाठवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत मृतदेह गावात पोहोचला होता. दरम्यान या प्रकरणी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण चौधरी यांनी सांगितले.

