राज शिर्के, मुंबई शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- ठाणे शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन आज राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. २७ जुलै रोजी या कार्यालयाचे उद्घाटन होणार होते, परंतु अतिवृष्टीच्या रेड अलर्टमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. कार्यक्रम काही दिवस लांबला असला, तरी ठाणेकर नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सोहळ्याला अभूतपूर्व गर्दी केली.
ठाणे हे राज्यातलं एक महत्त्वाचं शहर आहे. या शहराच्या मध्यवर्ती भागात राष्ट्रवादी काँग्रेसचं एक अत्याधुनिक आणि अद्ययावत कार्यालय उभं राहिलं याबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी समाधान व्यक्त केलं. हे कार्यालय ठाणेकर नागरिकांच्या संवादाचं माध्यम केंद्र बनेल, नागरिकांच्या तक्रारी, गाऱ्हाणी सोडवून घेण्याचं केंद्र बनेल असा विश्वास यावेळी मा. अजितदादांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून ठाणे आणि ठाणेकरांनी कायमच पक्षाला ताकद दिली आहे. या विश्वासाला तडा जाणार नाही असं काम करून दाखवू, असा शब्द मा. अजितदादांनी याप्रसंगी ठाणेकरांना दिला. ऑगस्ट क्रांती दिनी पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन होत आहे, याचा अर्थ ठाण्यात नक्की क्रांती घडणार, असं विधान यावेळी अजितदादांनी केलं.
या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, पक्षाचे प्रदेश प्रवक्ते आणि ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, सरचिटणीस नजीब मुल्ला, ठाणे शहर जिल्हा महिलाध्यक्ष सौ. वनिता गोतपगार, ठाणे शहर जिल्हा युवक अध्यक्ष नित्यानंद वाघमारे, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

