हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मो 9764268694.
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्हातील राजुरा ते सास्ती मार्गावरील धोपटाळा गावाजवळ एका भरधाव वेगाने जाणा-या ट्रक तिघांना चिरडले. यात दुचाकीस्वार आई – वडील व मुलगी अशा तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात आज 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7.50 वाजताच्या सुमारास घडला. ट्रक चालक हा मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवित असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, मद्यधुंद अवस्थेत एका ट्रक चालकाने एका वेकोली कर्मचा-याच्या वाहनाला धडक दिली. मात्र, सुदैवाने या अपघातात वेकोलि कर्मचारी बचावला. यानंतर पुढे जावून या ट्रकने ट्रिपल सीट जात असलेल्या एकाच कुटुंबातील तिघांना चिरडले यानंतर या ट्रक चालक इतक्यावरच थांबला नाही तर त्याने दुचाकीवाहन अर्धा किलोमीटर फरफटत नेले.
या भीषण अपघातात 35 वर्षीय निलेश मंगेश वैद्य, 30 वर्षीय रुपाली निलेश वैद्य व 3 वर्षीय राही वैद्य यांचा जागीच मृत्यू झाला, ट्रक चालकाने याआधी धोपटाला मार्गावर पती-पत्नीला धडक दिली होती ते दोघेही या अपघातात जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी राजुरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान ट्रक चालक वाहनासह फरार झाला असून राजुरा पोलिस या घटनेचा पुढील तपास करीत आहे.

