🖊️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन वर्धा,दि.20:- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक गावात अमृत कलश यात्रा काढली जात आहे. या यात्रेद्वारे घराघरातून माती व ज्यांच्याकडे शेती नाही अशा कुटुंबाकडून चिमुटभर तांदुळचे संकलन केले जात आहे. गावागावातून अमृत कलशाद्वारे प्राप्त ही माती तालुका, जिल्हा असा प्रवास करत दिल्लीला पाठविली जाणार आहे.
‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात विविध कार्यक्रम राबविण्यात आले. आता दि.30 सप्टेंबरपर्यंत प्रत्येक गावात अमृत कलश यात्रा काढण्यात येत आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने काढल्या जाणाऱ्या या यात्रेत प्रत्येक घरातून मुठभर मातीचे संकलन केले जात आहे. यात शेतकऱ्यांचा सहभाग घेतला जात आहे. ज्या कुटुंबांकडे शेती नाही, अशा कुटुंबांकडून चिमूटभर तांदुळ मातीच्या कलशामध्ये जमा केले जात आहे. प्रत्येक गावातून एक कलश तयार केला जातील.
गटग्रामपंचायत असल्यास ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रत्येक गावातून स्वतंत्र कलश तयार केला जातील. प्रत्येक गावातून एक कलश तयार केल्यानंतर उरलेल्या मातीचा उपयोग गावस्तरावर तयार केलेल्या अमृत वाटीकेकरीता करण्यात येणार आहे. गावातून कलश यात्रा काढतांना वाद्य वाजवत उत्साहवर्धक वातावरणात काढण्यात येत आहे. माती व तांदुळाचे संकलन करतांना पंचप्रण शपथ घेण्यात येत आहे. या यात्रेत स्थानिक पातळीवरील ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व ग्रामस्तरावरील शाळा, विविध शासकीय कार्यालये, अधिकारी, कर्मचारी सहभागी होत आहे.
जिल्ह्यात दि.1 ते 13 ऑक्टोंबर या कालावधीत गावस्तरावरील प्रत्येकी एक याप्रमाणे कलश गटविकास अधिकारी यांच्याकडे जमा करून घेतले जातील. प्रत्येक गावातून आलेली माती एकत्र करून त्यातून एक कलश तयार केला जातील. उरलेली माती तालुकास्तरावर तयार केलेल्या अमृत वाटिकेसाठी उपयोगात आणली जातील. यादरम्यान तालुकाठिकाणी देखील अमृत कलश यात्रा काढली जाणार आहे. या यात्रेत स्थानिक लोकप्रतिनिधी, सैन्यातील विरांच्या कुटुंबियांना सहभागी करून घेतले जातील.
तालुक्यातील अमृत कलश जिल्हास्तरावर पोहोचविला जातील. सर्व तालुक्यातून जिल्हा स्तरावर जमा झालेले कलश स्वयंसेवकांद्वारे मुंबई येथे दि.22 के 27 ऑक्टोंबर या कालावधीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी नेले जाणार आहे. मुंबई येथून हे कलश दिल्ली येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी पाठविले जातील. गाव व तालुका स्तरावर राबवावयाच्या या सर्व कार्यक्रमाचे सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

