हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हात वर्षाला निरोप देण्याच्या दिवशी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. आज रविवारची सुटी असल्या कारणाने नदी मध्ये पोहण्यासाठी गेलेल्या चंद्रपूर शहरातील एका 15 वर्षीय युवकाचा बल्लारपूर तालुक्यातील हडस्ती – कढोली पुलाजवळील वर्धा नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने एकच खळबळ माजली आहे. जीत रवींद्र गाऊत्रे वय 15 वर्ष, रा. नगिनाबाग, चंद्रपूर असे मृतक मुलाचे नाव आहे.
मृतक जीत रवींद्र गाऊत्रे आज सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास आपल्या 3 मित्रांसह वर्धा नदीच्या हडस्ती – कढोली पुलाजवळ पोहण्यासाठी गेला होता. नदीत तिघेही पोहत असताना जीत खोल पाण्यात गेला. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीत बुडायला लागला. याची जाणीव त्याचा मित्रांना होताच ते आरडाओरड करायला लागले. या तरुणाचा जोरजोरात आवाज आयकुन परिसरातील नागरिकांनी नदीपात्रात धाव घेतली. मात्र, तो दिसला नाही. त्यानंतर चंद्रपूर शहर पोलिस स्टेशनला कळविण्यात आले. आपत्कालीन विभाग तसेच स्थानिक मच्छिमार महादेव मेश्राम व संबा मेश्राम या बंधूंच्या सहकार्याने त्याला शोधण्यात आले. मात्र, त्याचा मृतदेहच पाण्यातून बाहेर काढण्यात आला. चंद्रपूर शहर पोलिसांनी मर्ग दाखल केला. यावेळी बल्लारपूरचे प्रभारी तहसीलदार ओंकार ठाकरे, मंडळ अधिकारी चौधरी, तलाठी महादेव कन्नाके आदींची उपस्थिती होती. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

