लेखक: प्रशांत जगताप मुख्यसंपादक महाराष्ट्र संदेश न्युज
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन महिला दिन विशेष:- आपण खूप भाग्यवान आहोत ज्या महाराष्ट्रात अनेक कर्तृत्ववान महिलांनी आपल्या जीवनाचे प्रतिबिंब या उभ्या समाजाला देऊन एक नव क्रांतीची बीजे रोवली ज्यांत रयेतेचे राज्य उभारण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या राजमाता जिजाऊ, क्रांतीक्रारी शिक्षणाचे तत्त्वज्ञान पेरुन सर्वांना शिक्षण देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सारख्या कित्तेक स्त्रियांचा समाजावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रभाव पडला आहे. त्यांचा विचाराने, अनुभवाने जीवनाला एक दिशा मिळते. ह्या सगळ्या महान कर्तृत्ववान स्त्रियांमध्ये एक सामायिक बाब होती ती म्हणजे त्यांची चिकाटी, धैर्य आणि बंडखोर वृत्ती. अशीच एक वर्तमानातील व्यक्ती ज्यांच्या बद्दल वाचलं, त्यांना ऐकलं आणि त्यांना पाहताक्षणी ती व्यक्ती आपलीशी वाटली त्या म्हणजे सीमाताई सुरूशे.
सीमाताई सुरूशे या वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील सर्वसामान्य घरातील महिला पण वडील भारतीय सैन्यात असल्यामुळे घरातील वातावरण अनुशासन, धैर्य आणि सेवा असे होते. त्यामुळे त्याच्या जीवनात भारतीय सैन्यात असल्याच्या कर्तृत्वाची बीजे आई वडीलाबरोबर सैन्य तुकडीच्या कॅम्प मध्ये राहताना मिळाली.

त्यामुळे सीमाताई यांना स्वतः च्या बुद्धिमत्तेवर आणि कर्तृत्वावर प्रचंड विश्वास होता. त्यामुळे शिक्षण असो की कुठलेही क्षेत्र असो अगोदर आपला पाया प्रत्येक मुलींनी मजबूत केला पाहिजे तरच तुम्ही गगनात उंच भरारी घेऊन आपल्या ठसा उमटवू शकता. हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. आपल्याला आपले विचार व्यक्त करता आले पाहिजे. सीमाताईच्या मते चांगल्या विचारांचे, गोष्टींचे मिळालेलं स्वातंत्र हि आयुष्यातील सर्वात मोठी चैनेची वस्तू आहे.

सीमाताई सुरूशे यांनी पुढे बरेच यशस्वी टप्पे पार केले, सामाजिक कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले, अनेकदा त्यांचा गौरव झाला. सीमा फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू केलेली समाजहिताची चळवळ त्या राबवत असताना, अनेक महिला मुली यांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी तत्पर असलेली सीमाताई यांना त्यांचा मुलीच्या एका प्रश्नाने त्यांचे जीवन पार बदलून गेले. वयाच्या ४५ वर्षी त्यांचा मुलीने त्यांना विचारले– “मम्मी, तुझा जीवनाचं नेमकं उद्दिष्ट काय आहे?”. ह्या वयात साधारणतः पालक मुलांना हा प्रश्न विचारतात, पण मुलीने विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी काही दिवस खुप विचार केला आणि आता आपल्याला या सर्व समाजातील गरीब, तृतीयपंथी (किन्नर), विधवा, शेतकरी महिला वर्गासाठी काही तरी अस करायचं ज्यामुळे सर्वांना न्याय मिळावा. एका प्रश्नानं जीवन बदलून जाणं काय असतं हे आपण त्या प्रश्नाकडे कसे पाहतो ह्यावर खूप अवलंबून असतं.
सीमाताईंवर छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले यांचा खूप प्रभाव आहे, त्यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर सहवास लाभला त्यांनी सीमाताई वर विश्वास दाखवला आणि सीमाताईनी आपल्या जीवनाचे फलित केले. कारण त्यांचा “उत्तम विचार, निर्णय क्षमता, परिस्थितीशी जुळवून घेत संघर्ष करून आपले उद्दिष्ट साध्य करता येते“. देण्याची भावना खूप मोठी आहे , त्याचा देखावा नसावा. मनाच्या तळातून जेव्हा ही भावना उचंबळून येते, तेव्हा ती निःस्वार्थी असते.
महाराष्ट्रातील अनेक पुरस्कार कितीतरी प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना मिळाले आहेत, पण त्यांची राहणी अतिशय साधी आहे. बाह्य दिखाव्यावर भुलून आर्थिक परिस्थिती चा अंदाज लावणाऱ्यांसाठी हे चोख उत्तर आहे. सीमाताई एक निसर्थी राजकीय नेत्या असून त्या खूप छान वक्त्या आहे, सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्या समाजातील तळागाळातील लोकांसाठी शिक्षण, सार्वजनिक स्वच्छता, ग्रामविकास इत्यादी कार्यांसाठी त्या कार्यशील आहेत. त्यांनी ह्या सगळ्या प्रवासात त्यांचा कुटुंबाला भक्कम साथ देत स्वतः ची एक आगळी वेगळी ओळख देखील बनवली, जी फार उल्लेखनीय आहे. मनाला गर्वाची बाधा जर शिवली तर त्याचे प्रायश्चित्त म्हणून त्या तिरुपती बालाजी आणि श्री क्षेत्र गजानन महाराज मंदिरात जाऊन काही काळ श्रमदान करून आपल्या कर्तव्याची जाणीव परत ताजी करतात.
“आयुष्य एक परीक्षा आहे, त्याची प्रश्नपत्रिका माहीत नाही, उत्तरपत्रिकेचे नमुने पण हाताशी नसताना काही नियम जर आपण स्वतःला घातले तर आयुष्य सोप्पं होऊन जाते.” सीमाताई पुढे म्हणतात, “तुम्ही एकाच वेळी अनेकांना खुश ठेवण्याचा प्रयत्नात एकालाही खुश ठेऊ शकत नाही. आग कधी आगीने विझत नाही, त्याला पाण्याचीच गरज लागते. चांगले नाते–संबंध, मानसिक शांतता हि मोठ–मोठ्या पुरस्कारांपेक्षा फार मोलाचे आहेत. तुम्ही किती बुद्धिमान आहेत किंवा तुम्ही किती धनवान आहात हे महत्वाचे नसून तुम्हाला यशस्वी बनण्यासाठी ध्येयाचा ध्यास आणि चिकाटी तुम्हाला यश देईल. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा. तुम्ही यशस्वी नक्की व्हाल“.
आज जागतिक महिला दिनानिमित्त भारतातल्या सर्व कर्तृत्ववान महिलांना माझा मानाचा मुजरा.

