हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांच्या वरोरा येथील आनंदवन आश्रमात 4 दिवसांपूर्वी एका विवाहित तरुणीची हत्या करण्यात आली होती. या हत्ये प्रकरणी पोलिसानी आरोपीला बेड्या ठोकुन त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली होती.
महिलेच्या हत्येचा असलेला आरोपीने पोलीस कोठडीत आत्महत्या केल्याची घटना आज समोर आली आहे. समाधान माळी वय वर्ष 25 असं या गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या आरोपीचं नाव असून वरोरा पोलीस स्टेशनच्या लॉकअप हा प्रकार घडला आहे. आज सकाळी 8 वाजून 30 मिनिटांच्या दरम्यान बुटाच्या लेस ने गळफास घेऊन त्याने ही आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
पोलीस कोठडीतच गळफास घेऊन आत्महत्या वरोरा येथील बाबा आमटे यांच्या कर्मभूमीत 26 जून रोजी 25 वर्षीय घटस्फोटित महिला आरती दिगंबर चंद्रवंशी हीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. हिंगणघाट येथील सासर सोडून आरती काही महिन्यांपासून आपल्या आई वडिलांकडे वास्तव्याला होती. याच काळात तिची ओळख समाधानशी झाली. आरतीच्या हत्येमागे लव्ह – ब्रेकअप – मर्डर असे वळण असल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. मात्र खुनानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवित आरोपी समाधान माळी याला चोवीस तासांत अटक केली. आरोपी समाधानला न्यायालयाने 4 जुलैपर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
आरोपी समाधान माळी हा कुष्ठरोगी असून तो एक वर्षाआधी आनंदवनात उपचाराला आला होता. तिथेच त्याचा परिचय आरतीशी झाला. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. आरोपीने लॉकअपमध्ये आत्महत्या केल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्यासह वरोरा तहसीलदार देखील प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते. या आत्महत्या प्रकरणातील बरेच प्रश्न अनुत्तरीत असून या घटनेचा तपास पुढील यंत्रणा करीत आहे.

