राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- भिवंडी शहरातील वऱ्हाळ नगर कामतघर या झोपडपट्टी परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करून पोलिसांची गाडीच्या काचा फोडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, येथे शेजारच्या मुलांच्या प्रेमप्रकरणातून संशय घेत शेजाऱ्याने भांडणात अल्पवयीन मुलीला आणि आईला मारहाण केली त्यात मुलीच्या वडीलांना मारहाण केली. यावेळी घाबरून अल्पवयीन मुलीने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अल्पवयीन मुलीला तातडीने उपचारासाठी आय जी एम रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी याघटनेची माहिती स्थानिक नारपोली पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस आयजीएम रुग्णालयात दाखल होऊन अल्पवयीन मुलीचा जबाब घेत असतानाच या गुन्ह्यातील आरोपी हे वऱ्हाळ नगर कामतघर येथे उभे असल्याचे समजले असता नारपोली पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक आकाश पवार व सुनील शिंदे व तडवी हे पथक पोलिस जीप घेऊन घटनास्थळी आरोपींना पकडण्यासाठी गेले.
या वेळी तेथील काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी या पोलिसपथका सोबत अरेरावीची भाषा वापरून त्यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा व आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला असता, जमावाने पोलिसांवर व पोलिस जीप वर दगडफेक करून हल्ला चढवल्याची घटना घडली आहे.
पोलिसांवर दगडफेक, गाडीचे मोठे नुकसान: यावेळी पोलिसांचा गाडीचे मोठे नुकसान झाले असून गाडीच्या काचा फोडण्यात आल्या आहे. त्यात पोलिस शिपाई तडवी यांना दगड लागल्याने ते जखमी झाले आहेत. सध्या पोलीस शिपाई तडवी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून नारपोली पोलीस स्टेशन मध्ये अल्पवयीन मुलीच्या आईकडून तसेच पोलिस उपनिरीक्षक आकाश पवार यांच्या तक्रारीवरून दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकारणी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर पुढील तपास पोलीस करत आहे.

