मुंबई 30 सप्टेंबर:- शिंदे-फडणवीस सरकारने गुरूवारी रात्री उशिरा राज्यातील तब्बल 44 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. नवी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांची बदली करण्यात आली आहे. अभिजित बांगर यांची ठाणे महानगर पालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. नवी मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्तपदी राजेश नार्वेकर यांची नियुक्ती केली गेली. राजेश नार्वेकर ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते. त्यांच्या जागी अशोक शिंगारे यांची ठाण्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आलीये
मनिषा पाटणकर म्हैसकर यांची सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली, याशिवाय त्यांच्याकडे मराठी भाषा विभागाच्या प्रधान सचिवपदाचाही अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. तर डॉ. अश्विनी जोशी यांची वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी अभिमन्यू काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिवपदी मिलिंद म्हैसकर, प्रवीण दराडे यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सचिवपदी, विवेक भिमनवार यांची परिवहन आयुक्तपदी, वल्सा नायर यांची गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिवपदी, उद्योग विभागाच्या प्रधान सचिवपदी हर्षदीप कांबळे, एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी डॉ. विपीन शर्मा, पर्यटन विभागाच्या सचिवपदी सौरभ विजय, मुंबई हाऊसिंग बोर्डाच्या मुख्य अधिकारीपदी मिलिंद बोरीकर, सार्वजनिक विभागाच्या प्रधान सचिवपदी संजय खंदारे यांची तर देवेंद्र सिंग यांची रत्नागिरी जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

