✒️जळगाव जिल्हा प्रतिनिधी
जळगाव:- जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका तरुणाचे मेहकर येथील तरुणीबरोबर दोन महिन्यांपूर्वी विवाह झाला परंतु नवविवाहित वधू दोनच दिवसात पसार झाल्याने वरपक्षाने लग्नात मध्यस्थी करणाऱ्याकडे दिलेल्या रकमेसाठी तगादा लावला. मात्र, दलालांकडून पैसे मिळत नसल्याने त्या वृद्ध मध्यस्थीने आत्महत्या केल्याने संपूर्ण जिल्हा हादळला आहे. या प्रकरणी मेहकरातील तिघांना पिंपळगाव जिल्हा जळगाव पोलिसांनी गजाआड केले आहे. दयाराम चौधरी वय 68 वर्ष, रा. शिंदाड, पाचोरा, जिल्हा जळगाव असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे. त्यांनी गावातील उत्तम चौधरी यांच्या शेतातील झाडाला ठिबक सिंचनच्या नळीने गळफास लावून मागील 2 ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. प्रकरणी त्यांचा मुलगा काशीनाथ चौधरी याने पिंपळगाव पोलीस ठाण्यात 14 सप्टेंबर 2022 ला तक्रार केली. पोलिसांनी डोणगाव येथील राहिवासी शफउत खान जब्बार खान, रसूल रफिक बागवान आणि भुऱ्या नामक व्यक्ती यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करून गजाआड केले. तपासाअंती विलक्षण कहानी समोर आली.
जळगाव जिल्हातील पाचोरा तालुक्यातील नागदेवळा येथील एका मुलाचे लग्न जुळत नव्हते. त्याने त्यांच्याच समाजातील दयाराम नारायण चौधरी यांना एखादी मुलगी पहा असे सांगितले. त्यांनी वरील तिघांशी संपर्क साधला असता त्यांनी मेहकर येथील सोनाली या मुलीचे स्थळ सुचविले. मुलगी पसंत पडल्याने लग्नाची बोलणी सुरु झाली. आरोपींनी दयाराम चौधरी यांच्याकडून लग्न जुळवून देण्यासाठी 1 लाख 30 हजार रुपये घेतले. 26 जुलै 2022 रोजी पाचोरा येथे लग्न सर्व रिती रीवाजाने पार पडले. मात्र, लग्नाच्या दोन दिवसात नवविवाहिता 28 जुलैला पसार झाली.
त्यामुळे वराकडील मंडळीने नवविवाहितेच्या आईला, नातेवाईकांकडे नवरी आणून सोडा किंवा लग्न जुळवण्यासाठी दिलेले पैसे परत द्या, असा तगादा लावला. तसेच मध्यस्थी करणारे दयाराम चौधरी यांच्याकडे वारंवार विचारणा सुरु केली. दयाराम यांनी त्या तिघांकडे सतत पैशाची मागणी केली. मात्र, ना पैसे परत मिळाले ना नवविवाहिता परत आली. यामुळे त्रस्त दयाराम चौधरी यांनी आत्महत्या केली. तपास चक्र फिरल्यावर लग्नाची ही बाब उघड झाली.