विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी क्र. 9421856931
एटापल्ली ==
तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था व प्रशासनाच्या दीर्घकाळ चाललेल्या दुर्लक्षाविरोधात अखेर पत्रकार संघटना एटापल्ली आक्रमक झाली असून आज दिनांक 9 फेब्रुवारी 2026 पासून सार्वजनिक बांधकाम विभाग, एटापल्ली कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे. या आंदोलनामुळे तालुक्यातील रस्ते प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
एटापल्ली–देवदा–गडचिरोली हा जिल्हा मुख्यालयाकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग तसेच एटापल्ली–जारावंडी व एटापल्ली–हेडरी–गट्टा हे तीनही प्रमुख रस्ते सध्या पूर्णतः खड्डेमय व जीर्ण अवस्थेत आहेत. या मार्गावरून दररोज शेकडो नागरिक, विद्यार्थी, रुग्ण व शासकीय कर्मचारी प्रवास करीत असतात. मात्र रस्त्यांची अवस्था इतकी बिकट झाली आहे की लहान-मोठे अपघात नित्याचे झाले असून अनेकांना जीव गमवावा लागल्याची गंभीर बाब समोर आली आहे
विशेषतः गर्भवती महिला, नवजात बालके, वृद्ध व गंभीर रुग्णांना तालुका व जिल्हा रुग्णालयात नेताना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. खड्डेमय रस्त्यांमुळे रुग्णवाहिकेतच रुग्णांची प्रकृती बिघडत असल्याच्या घटना घडल्या असून नागरिकांच्या जीविताशी सुरू असलेला हा खेळ थांबविण्याची मागणी जोर धरत आहे
या संदर्भात पत्रकार संघटना व नागरिकांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच उपविभागीय प्रशासनाकडे यापूर्वीच लेखी निवेदने सादर करण्यात आली होती. दिनांक 27 नोव्हेंबर 2025 रोजी संबंधित विभागास अर्ज देऊन दोन महिन्यांचा अवधी देण्यात आला होता. मात्र कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आल्याचे संघटनेने स्पष्ट केले

