हनिशा दुधे चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी मो.9764268694
बल्लारपूर (दि. २४ फेब्रुवारी २०२६):
शहरातील उपविभागीय कार्यालयात आयोजित ‘जनता दरबार’ प्रसंगी आम आदमी पार्टी, बल्लारपूर तर्फे शहराच्या ज्वलंत समस्यांबाबत माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रारीची गंभीर दखल घेत उपस्थित मुख्याधिकाऱ्यांना शहरातील मोकाट जनावरे, अतिक्रमण आणि पार्किंगची समस्या तात्काळ सोडवण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
शहरातील दहेली, बामणी ते बॉटनिकल गार्डनपर्यंतच्या महामार्गावर व्यापाऱ्यांनी अवैध शेड उभारून अतिक्रमण केले आहे. विशेषतः तीन एक्का गेट आणि जुना बस स्टँड परिसरात दारूच्या दुकानांसमोर लागणाऱ्या वाहनांच्या रांगांमुळे सामान्य नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे. तसेच, पेपर मिलची लाकूड वाहून नेणारी जड वाहने (ट्रक) रस्त्यावर कुठेही उभी राहत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले.
यावेळी कटा गेट, न्यू बस स्टँड, रेल्वे चौक, बी.टी.एस प्लॉट चौक, जी.एन. कॉलेज चौक, बामणी आणि माऊंट फोर्ट शाळा परिसरातील अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे करण्याची मागणी करण्यात आली. तसेच, ज्या लॉन, शॉपिंग कॉम्प्लेक्स व मंगल कार्यालयांकडे स्वतःची पार्किंग व्यवस्था नाही, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणीही लावून धरली.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानंतर आता स्थानिक प्रशासन काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. “शहरातील रस्ते सामान्य जनतेसाठी सुरक्षित झालेच पाहिजेत, अन्यथा आम आदमी पार्टी तीव्र भूमिका घेईल,” असा इशारा शहराध्यक्ष रवि पुप्पलवार यांनी दिला आहे.
याप्रसंगी ‘आप’चे शहर उपाध्यक्ष- अफजल अली, संघटन मंत्री- रोहित जंगमवार, प्रवक्ता- आसिफ शेख व इत्यादी उपस्थित होते.
