युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर गोंगले व जिल्हासचिव जावेद अली यांच्या अथक प्रयत्नाने रस्त्याच्या कामाला सुरुवात.
गडचिरोली जिल्यातील
अहेरी तालुक्यातील मर्रीगुडम गावाचा रस्ता स्वातंत्र्यापासून रखडलेला होता. मात्र अखेर या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अहेरी तालुका युवा पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर गोंगले आणि जिल्हा सचिव जावेद अली यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा प्रश्न मार्गी लागल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त करत त्यांचे आभार मानले.
मर्रीगुडम हे गाव आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले असले तरी व्ही.आर. क्रमांकाचा अधिकृत रस्ता नसल्यामुळे गावकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात रस्ता पूर्णपणे खराब होत असल्याने गावात ये-जा करणे कठीण होत होते.
गावकऱ्यांनी आपली समस्या पत्रकारांसमोर मांडली. त्यानंतर पत्रकारांनी या प्रश्नाला माध्यमातून वाचा फोडल्याने प्रशासनाचे लक्ष वेधले गेले. परिणामी, मुख्य रस्त्यापासून मर्रीगुडम गावापर्यंतच्या रस्त्याला मंजुरी मिळाली.
सध्या रस्त्याचे माती व मुरूम टाकण्याचे प्राथमिक काम पूर्ण झाले असून उर्वरित काम लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. यापूर्वी गावात एखादा रुग्ण गंभीर अवस्थेत असल्यास किंवा प्रसूतीसाठी महिलेला रुग्णालयात नेताना मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. अनेकदा वेळेत उपचार मिळण्यात अडथळे येत होते.
आता रस्त्याचे काम सुरू झाल्याने या सर्व समस्यांपासून दिलासा मिळणार असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. लवकरात लवकर रस्ता पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणीही नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.उपस्थित अहेरी तालुका युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे सदस्य सुरेश दुर्गे, तर सल्लागार मोहसिन शेख उपस्थित होते.

