आता थांबायचं नाही,कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा- राजे अम्ब्रिशराव आत्राम.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
*अहेरी:-* आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाअभियान २०२६ अंतर्गत आयोजित पंडित दिनदयाल उपाध्याय प्रशिक्षण शिबिराचा अहेरी येथे उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन अहेरी येथील माता कन्यका माता मंदिरात करण्यात आले होते. या शिबिरातून संघटन बळकटीकरणावर विशेष भर देण्यात आला.या शिबीरातून स्पष्ट संदेश दिला की संघटन मजबुत, तर विजय निश्चित.प्रसंगी मंचावर माजी खासदार अशोक नेते,जिल्हा अध्यक्ष रमेश बारसागडे,जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,सुरेश शाह,बाबुराव कोहळे,आशिष पिपरे,तालुका अध्यक्ष विकास तोडसाम,नगरसेवक अमोल गुडेल्लीवार, नगरसेवक विकास उईके,नगरसेविका सौ.शालिनीताई पोहनेकर आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांना संघटनात्मक कार्यपद्धती, पक्षाची विचारधारा आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जबाबदाऱ्या याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.शिबिरामध्ये बूथस्तरावरील संघटन मजबूत करण्यासाठी विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या क्षेत्रात सक्रिय राहून पक्षाची भूमिका जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवावी, आता थांबायचं नाही जोमाने कामाला लागा,असे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच नव्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देऊन संघटन विस्तारावरही भर देण्यात आला.
समारोप प्रसंगी बोलताना राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी कार्यकर्त्यांनी शिस्त, समर्पण आणि सेवाभाव जपत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे सांगितले. त्यांनी ‘अंत्योदय’च्या विचारधारेवर आधारित काम करत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
या शिबिरात अहेरी तालुक्यातील अनेक बूथ प्रमुख/पन्ना प्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक पदाधिकारी/कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

