ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील नाट्य प्रशिक्षणाची सुवर्णसंधी
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
अहेरी : ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने National School of Drama तथा Indian Oil Corporation यांच्या सहकार्याने आणि आदिवासी ग्रामीण साहित्य बहुउद्देशीय सांस्कृतिक शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३० दिवसीय निशुल्क नाट्य प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ बुधवार, दिनांक २० मे २०२६ रोजी वन वैभव शिक्षण मंडळ द्वारा संचालित भगवंतराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय अहेरी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडला.
हे प्रशिक्षण शिबिर दिनांक २० मे ते २० जून २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ८ ते ११ या वेळेत पूर्णपणे निशुल्क स्वरूपात आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना अभिनय, रंगमंच सादरीकरण, संवाद कौशल्य, नाट्यदिग्दर्शन, व्यक्तिमत्त्व विकास, शारीरिक हालचाली, आवाजाचे प्रशिक्षण आणि सांस्कृतिक जाणीव यांचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील नाट्यकलेचे मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वन वैभव शिक्षण मंडळ अहेरीचे सचिव माननीय अब्दुल जमीर हकीम साहेब उपस्थित होते. उद्घाटक म्हणून दृष्टि फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ. शाहीन अब्दुल जमीर हकीम यांनी उपस्थित राहून शिबिराचे उद्घाटन केले. आपल्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांनी कला आणि संस्कृतीच्या माध्यमातून आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सर्जनशीलता विकसित करण्याचे आवाहन केले. तसेच अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी मुंबई येथील प्रख्यात नाट्य मार्गदर्शक अखिलेश खन्ना सर यांनी मुख्य मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना नाट्यकलेचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी रंगभूमी ही केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी साधन असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संयोजन कुमारी खुशबू मॅडम आणि राहुल पेंढारकर सर यांनी केले.
कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य शाहिद शेख सर तसेच राणी दुर्गावती हायस्कूल येथील मुख्याध्यापक माननीय लोणबले सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेऊन कला क्षेत्रात प्रगती करण्यासाठी प्रेरित केले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्राजक्ता पेदापल्लीवार मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाहिद शेख सर यांनी सादर करून शिबिराच्या उद्देशावर प्रकाश टाकला. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुहास मेश्राम यांनी मानले.
या उद्घाटन कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शिबिराच्या माध्यमातून अहेरीसारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय दर्जाचे नाट्य प्रशिक्षण उपलब्ध होत असल्याने परिसरात समाधान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

