✒️प्रविण जगताप, प्रतिनिधी
वर्धा:- यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी बँकांना वाटप करण्यात आली आहे. ही रक्कम शेतकऱ्यांना तातडीने वितरित करणे आवश्यक असतांना काही बँकांकडून दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशी दिरंगाई करणाऱ्या बँकांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे.
यावर्षी वर्धा जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली. यात मोठ्या प्रमाणावर शेत पिकांचे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करत अहवाल शासनास सादर केला. त्यानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी शासनाने 364 कोटी 65 लाख रुपये जिल्ह्यास उपलब्ध करून दिले. ही रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी तहसिलदारांमार्फत बँकांना वितरित करण्यात आली.
वर्धा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीत 2 लाख 45 हजार 20 शेतकरी बाधित झाले होते. शासनाच्या निकषाप्रमाणे पात्र शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी बँकांना देण्यात आलेली रक्कम काही बँका वाटपात दिरंगाई करीत असल्याचे तर काही बँका ही रक्कम स्वतःकडे ठेवून घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर अनुदान तातडीने वितरणाचे शासनाचे निर्देश असतांना सुध्दा बँका दिरंगाई करित असल्याने अशा बँकांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीनुसार नुसार गुन्हा दाखल केले जाणार आहे. बँकांनी शेतकऱ्यांना वितरणासाठी तहसिलदारांकडून प्राप्त रक्कम तातडीने शेतकऱ्यांना वितरित करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी बँकांना दिले आहे.
330 कोटींचे वितरण
वर्धा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त 2 लाख 45 हजार शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी 364 कोटी 65 लाख रुपये प्राप्त झाले आहे. यापैकी 330 कोटी रुपये तहसिलदारांकडून बँकांना वितरीत करण्यात आले आहे. बँकांकडून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जात आहे.