✒️प्रविण जगताप, विशेष प्रतिनिधी
मो. 9284981757
वर्धा:- जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी इयत्तानिहाय व विषयनिहाय सर्व अध्ययन निष्पत्ती प्राप्त करणे अनिवार्य आहे. यामाध्यतातून सर्व विद्यार्थ्यांचा पायाभूत क्षमतांचा विकास करणे व त्यापुढे त्यांच्या सर्व उच्चस्तरीय मानसिक क्षमतांचा विकास करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षण व्यवस्थेतील प्रत्येक घटक विशेषत: शिक्षकांनी नियोजनबध्द प्रयत्न करण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले.
राष्ट्रीय स्तरावरुन शिक्षण मंत्रालयाव्दारे इयत्ता 3 री, 5 वी, 8 वी 10 वी या वर्गातील विद्यार्थ्यांची भाषा, गणित, परिसर अभ्यास, सामान्य विज्ञान, सामाजिक शास्त्रे, इंग्रजी या समाविष्ठ विषयांची संपादणूक चाचणी घेण्यात आली होती. सदर संपादणूक चाचणीच्या अहवालाचे विश्लेषन करुन जिल्ह्याची स्थिती जाणुन घेण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने एक दिवसीय पोस्ट एनएएस कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सदिच्छा भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधतांना ते म्हणाले.
या कार्यशाळेस जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील सर्व अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक, विषय साधन व्यक्ती, अद्यापकाचार्य उपस्थित होते. वर्धा जिल्ह्याची एनएएस व पीजीआय या दोन्ही मधील स्थिती फारच चिंताजनक असून शिक्षण व्यवस्थेतील सर्व घटकांनी तसेच शिक्षकांनी याकडे गांर्भियाने लक्ष देण्याची गरज असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले.
एनएएस-2017 व एनएएस 2021 या दोन्ही अहवालावरुन जिल्ह्याची विषयनिहाय, व इयत्तानिहाय स्थिती जाणून घेण्यात आली. अध्ययन निष्पत्तीनिहाय विचारमंथन करुन गटकार्याच्या माध्यमातून उपाय सुचविण्यात आले. कार्यशाळेमध्ये कार्यशाळा सुलभक म्हणुन संस्थेच्या डॉ. नितु गावंडे, वरिष्ठ अधिव्याख्याता व प्रतिभा देशपांडे यांनी पूर्णवेळ मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या यशस्वतीतेसाठी संस्थेचे प्राचार्य डॉ. मंगेश घोगरे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यशाळेमध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील वरीष्ठ अधिव्याख्याता मंजुषा औढेकर, डॉ. संगिता महाजन, मधुमती सांगळे, दिपाली बासोळे यांनी सहभाग घेतला, असे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांनी कळविले आहे.