संतोष मेश्राम, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण
बिरसा मुन्डा ते बाबूराव मडावी हा एक आदिवासीचा वेगवेगळया क्रांतीचा काळ जरी असला तरी ज्या ज्या आदिवासी विरांनी आपल्या प्राणांच्या शेवटच्या घटिके पर्यंत आपल्या समाजाप्रतीच्या खांद्यावरील जबाबदारीला नेहमी न्याय देण्याचाच जो प्रयत्न चालविला त्याचेच हे फलित आहे की आज तुम्ही आम्ही गर्वाने आदिवासी म्हणून ह्या मनुवादी आणि कटुवादि दुनियेत आपले स्थान टिकवू शकलो व गर्वाने आदिवासी बाणा समोर मांडू शकलो
आदिवासी इतिहास तसा आदिमानवाच्या काळापासूनचाच क्रांतिवादि, विज्ञानवादी , सांस्कृतिकवादी राहिलेला आहे. पण 19 व्या शतकात संविधान निर्मीती नंतर जेव्हा ख-या अर्थाने स्वातंत्र देशात जगताना आदिवासी समोर जे काही कायदे आदिवासी विरोधी होत होते.ज्यात आरक्षणाचे षडयंत्र म्हणा की ना रीतीने आदिवासी वर होत असलेले अन्याय अत्याचार म्हणा. जो चोहोबाजूनी आदिवासीवर दडपशाही धोरण स्वतंत्र भारतात चालले होते त्याला ख-या अर्थाने आधुनिक काळात कोणी समजले असेल आणी वस्तुस्थिती लक्षात घेवून त्यावर मात करीत आदिवासी समाजांसाठी सर्वस्व अर्पण करीत ज्यांनी समाजाला दिशा देण्याचा विडा उचलला व आपल्या कर्तुत्वाने वाघासारखा झटत कैलाशवासी झाला असे नाव म्हणजे कै.बाबुरावजी मडावी साहेब स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा अद्वीतिय योद्धा
आज त्यांची 94 वी जयंती. त्यांच्या जयंती प्रित्यर्थ त्यांच्या जिवन गाथेवर भुतकाळात जाऊन स्मरण केलं तर आठवतं, हया नेत्याला व्यक्तिक कुटुंब नव्हतंच ! संपूर्ण भारताच्या आदिवासी समाजाला आपले कुटुंब समजणारा हया नेत्याने स्वता:च्या व्यक्तिक कुटुंबाला समाजप्रेमापोटी कधीच महत्वच दिले नाही. दिवसरात्र फक्त आदिवासी समाजाच्या पारतंत्र्याचा विचार ! स्वातंत्र्य मिळुनही समाजाच्या दुरावस्थेबद्दल विचार करून ते अस्वस्थ होत असत.
त्यांचे वडील नारायणराव लक्ष्मण मडावी हे मुळचे गडचिरोली जिल्ह्यातील (तत्सम चंद्रपुर) कोरेगांव ता. आरमोरीचे रहिवासी पण पोटाची भुख भागविण्यासाठी नागपूरला आलेत.ते हितवाद प्रेसला लाईन-आॅपरेटर म्हणून कामावर रूजु झाले. ते इंग्रजांच्या काळातील ४ था वर्ग पास पण इंग्रजीवरील त्यांचे प्रभुत्व असाधारण होते.ते स्वभावाने अत्यंत कडक व शिस्तप्रिय होते.रोज संध्याकाळी ते आदिवासी विद्यार्थ्यांना निःशुल्क इंग्रजी शिकवित असत.त्यामुळे त्यांना सर्व नारायण मास्तर म्हणुनच ओळखत असत, व तीच त्यांची ओळख समाजात प्रस्थापित झाली.
अर्थातच संपूर्ण कुटुंब त्यांच्या उपस्थितीत थर – थर कापायचे. ६ मुलं व सात मुली असा अवाढव्य संसार एकट्याच्या पगारावर चालविणे त्यांना कठीण जात होते, म्हणुन वयाच्या ६ व्या वर्षापासूनच बाबुरावजी स्वता:चा खर्च इंग्रजांची चाकरी करून चालवत.इंग्रज अधिकारी गोल्फ खेळत असत, त्यांच्या खेळ्याच्या साहित्याची बॅग ते धरायचे. जी मजुरी मिळायची त्यातूनच त्यांनी स्वता:च्या शिक्षणाची सोय केली. ते उंच देखणे होते, त्यासोबत त्यांनी मेहनत करून शरीर कमविण्यासाठी आखाड्यात कुस्त्यासुद्धा खेळल्या. वर्ष लोटत गेली, तो काळ इंग्रजांच्या गुलामगिरिचा होता, साहजिकच बाबुरावजींचे रक्तात असंतोष निर्माण झाले. त्यांनी व त्यांच्या मित्रांनी नागपूर येथील पोष्ट ऑफिस जाळले. त्यांचे काही मीत्र पकडल्या गेले, परंतू बाबुरावजी धावण्यात तरबेज असल्यामुळे इंग्रजांच्या हाती आले नाही. जे पकडल्या गेले त्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून प्रमाणपत्र मिळाले,पण बाबुरावजी त्यापासुन वंचित राहिले. त्यानंतर त्यांनी सायन्स काॅलेजमधे लेबाॅरटरी असिस्टंट म्हणून नौकरी केली. पण शिक्षण सोडले नाही. त्यांनी पाॅलिटेकनीचा डिप्लोमाचा अभ्यासक्रम मेरीटमधे पास केला. त्यानंतर पब्लिक वर्क्समध्ये ड्राॅफ्टमन पदावर नौकरी स्विकारली.
समाजकार्याची आवड रक्तगणात असल्यामुळे ते आदिवासी समाजाचे प्रत्येक महत्वपुर्ण कार्यक्रमात अगत्याने भाग घ्यायचे.सतरंजी उचलण्यापासून त्यांनी सामाजिक जीवनाची सुरूवात केली. श्रोत्यांना पाणी पाजणे व तत्कालीन आदिवासी नेत्यांची भाषणं ऐकणं व घरी जाऊन त्याविषयांवर वडिलांशी चर्चा करायचे.संविधानाचा अभ्यास व त्यातील आदिवासींसाठीचे हक्क हा त्यांचा आवडीचा विषय होता.सतत अभ्यासामुळे त्यांचे मन आणखी खिन्न होत गेले.संविधानामध्ये आदिवासींसाठी प्रचंड अधिकार असतांना माझा समाज इतका मागासलेला कां ? या भावनेने ते अस्वस्थ व्हायचे.नागपूर व मध्यप्रदेशाचा काही भाग म्हणजेच सी.पी. अँड बेरार येथील प्रस्थापित नेते आदिवासी समाजाचे शोषण करित आहेत, व आदिवासी समाजाला त्यांच्या मुलभूत हक्कांपासून वंचित ठेवत आहेत.हे त्यांच्या तल्लख दिमाखात पटकन लक्षात आले. इथून त्यांचा खरा सामाजिक प्रवास सुरू झाला.
समाजसेवेची खरी गरज ग्रामीण भागांत जास्त असल्याचे त्यांच्या धान्यात आल्याबरोबर त्यांनी तसा मनात निर्णय पक्का केला.त्यांनी चीफ इंजीनियर मुखर्जीसाहेबांकडे चंद्रपुरला बदली करण्याचा अर्ज केला. त्यांनी कारण विचारले असतां ,त्यांनी निर्भिड उत्तर दिले कि, “मला आदिवासी समाजाची सेवा करायची आहे.त्यांचे ऋण चुकवायचे आहे.सरकारी कामा नंतरचा वेळ मी समाजकार्य करणार आहे.” त्यांचे उत्तर ऐकुन मुखर्जीसाहेब अवाक झाले . त्यांनी पुन्हा विचारले कि, मी परवानगी दिली नाहीतर तु काय करशील ? ते म्हणाले, “मी नौकरी सोडुन देईन.” त्यांची समाजाप्रतीची प्रतिबद्धता बघुन शेवटी ते नरमले व बाबुरावजींची बदली चंद्रपुरला करण्याचे आदेश निर्गमित केले.
चंद्रपुरला ते आपल्या कुटूंबासह बालाजी वार्डात शंकरराव चिंचोळकर यांचे मातीच्या घरात किरायाने राहीले. आदिवासी समाजाची सेवा करण्याचा त्यांच्या दांडग्या आत्मविश्वासाची ही कसोटी होती. त्यांनी नारायणसिंह उइके यांच्या सोबत “जबरानजोत” आंदोलनात उडी घेतली व बघताबघता नारायणसिंह उइके यांचे पट्टशिष्य म्हणुन आदिवासी समाज त्यांना ओळखू लागला.
आता मी समाजकार्यासाठी समाजाला वेळ कमी देत आहे, असा आभास बाबुरावजी यांना होऊ लागला. त्यांनी स्वता:च्या कुटुंबियांची पर्वा न करता तात्काळ नौकरीचा राजीनामा दिला. कुटुंबावर उपासमारीची वेळ आली, पण समाजकार्याने भारावलेल्या बाबुरावजींनी त्याची परवा केली नाही.
या संकटकाळाच्या समयी मा.श्री. ऋषी मसराम काका जे गव्हरमेन्ट प्रेसमधे नौकरी करायचे त्यांनी व आकाशवाणीला नौकरी करणारे श्री.सी.बी मडावी काका हे मदतीला धावून आले. त्यांनी आपल्या पगारातून पैसे देऊन समाजव्रत सुरू ठेवण्यासाठी मोलाची मदत केली.ह्या महान प्रभुतींनी मदत केली नसती तर आदिवासी समाजाचा उगवता प्रखर तारा तेंव्हाच लोप पावला असता हे ही तितके खरेच समाज भावना व समाजाचा अभिमान असल्यास नौकरीत राहूनही समाजसेवा करतां येऊ शकते.कोणत्याही माध्यमातून तो आपले योगदान देऊ शकतो याचे हे जिवंत उदाहरण आहे.
एका सत्य घटनेचा येथे आवर्जून उल्लेख करावयासा वाटतो. बाबुरावजी मडावी हे अत्यंत लहान वयापासूनच निष्णात तबलावादक होते. तरूण वयात ते व माणिकराव पोपट ह्यांचे जिव्हळ्याचे व मित्रत्वाचे नाते संबंध जगजाहिर होते.या दोघांनीही एकदा आकाशवाणीवर उस्ताद अल्लारख्खा( सध्याचे उत्कृष्ट तबला वादक उस्ताद जाकीर हुसैन यांचे वडील) यांची साथ केली. त्यांनी बाबुरावजींच्या तबलावादनाची दिलखुलास तारीफ केली व आकाशवाणीच्या अधिकाऱ्यांना त्यांचे नाव आंतरराष्ट्रीय यादीत समाविष्ट करण्याची सूचना केली. त्यांच्या या सूचनेच्या अनुषंगाने माणिकराव पोपटकर व बाबुरावजींना इंग्लंड येथे तबलावादक प्रशिक्षण देण्याची नौकरी मिळाली. माणीकराव पोपटकरांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी त्वरित इंग्लंडला जाण्याची तयारी सुरू केली. पण तो पर्यंत बाबुरावजींचे मनपरिवर्तन झालेले होते. त्यांचा समाजसेवेचा दृढ निश्चयाच्या निर्णयात तीळमात्र बदल झाला नाही. त्यांनी इंग्लंड जाण्यास स्पष्ट नकार दिला.आपल्या प्रिय मित्राला जे बोलले ते मार्मिक शब्द जे बाबुरावजीच्या मातेच्या तोंडून पोराचे कौतुक म्हणून म्हणा की गहिंवरलेल्या भावना म्हणा त्या अशा ऐकायला मिळायच्या की , आज ते उत्तर ह्या निस्वार्थ भावनेने कधीच दिसून येणार नाही . त्यावेळेस बाबुरावजी यांनी माणिकराव पोपट यांना म्हणाले होते , “अरे मित्रा, तुझ्यासोबत येऊन मी नक्कीच श्रीमंत होईन. ऐश्वर्यात जीवन जगु शकतो. पण माझ्या या लाखो आदिवासी बांधवांच काय ? ते आजही अर्धनग्न आहेत. दोनवेळच्या जेवणासाठी त्यांना दरदर भटकावे लागते.ते काट्यावर व कुंपणावर झोपतात. मी तुझ्यासोबत आलोतर होऊ शकते,माझा पलंग सोन्याचा असू शकेल.पण मला झोप कशी येईल रे ” हे ऐकून माणिकराव पोपट सुद्धा अवाक झाले पण बाबूरावजी यांच्या संकल्पावर मैत्रीची छाप व त्यांच्या उज्वल भविष्याचा प्रभाव नाही टाकू शकले.
प्रभावी व्यक्तिमत्व, प्रगाढ अभ्यास, मृदू-स्वभाव व ओजस्वी वाणी या निसर्गदत्त गुणांचे संगम त्यांच्या स्वभावात जन्मजात असल्यामुळे ते आदिवासी समाजामध्ये लोकप्रिय होऊ लागले. त्यांनी “आदिवासी सेवामंडळ” या नावाची संस्था स्थापन केली. महाराष्ट्रातील जनमान्य नेत्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र शासनाच्या व केंद्र शासनावर आदिवासी समाजाबद्दल उदासीनतेबाबत तीव्र आंदोलन छेडण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पायाखाली पालथा घातला. तत्कालिन महाराष्ट्राचे सर्व अनु.जमातीचे प्रभावी नेत्यांचे शिष्टमंडळ घेऊन त्यांनी दिवंगत पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरूजींची भेट घेतली. आदिवासी समाजाची वास्तविक परिस्थिती त्यांनी प्रभावीपणे मांडली. त्यांचा सखोल अभ्यास व प्रश्नांचे प्रस्तुतीकरण बघुन नेहरूजी अत्यंत प्रभावित झाले. आपल्या व्यक्तिगत डायरीत त्यांनी बाबुरावजींचे नाव नोंदवून घेतले. त्या कालखंडातील आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांचा कल राजकारणाकडे जास्त असल्यामुळे “राजकारणातून समाजकारण“ ही बाबासाहेब आंबेडकरांची दिशा त्यांना योग्य वाटली. त्यादिशेचा प्रवास सुरू होताच त्यांनी आदिवासी समाजाच्या ज्वलंत प्रश्नांवर जनमत घेण्यास सुरवात केली. समस्यांचा डोंगर होता.आदिवासी समाज विस्कळीत ! ना दशा न दिशा !
त्यांनी दृढ निश्चय केला मला ही परिस्थिती बदलायची आहे.त्यांनी चंद्रपुरात आदिवासी मेळावे आयोजित केले.आदिवासी समाज जागृतीचे काम अधिक जोमाने चालविले.दिवस-रात्र एक केला, समाज जागृतीसाठी ! माझ्या कुटुंबाचे काय होईल, याची पर्वा त्यांनी कधीही केली नाही. चने आणी गुडावर दिवाळी साजरी केली. मुलांच्या शाळेची फी भरायला पैसे नव्हते.पत्नीच्या अंगावर फक्त एक साडी, एकवेळ जेवणाची सुद्धा सोय नव्हती . ६ मुलं कुपोषणाने मरण पावलीत. पण कोणत्याही दुःखद घटनांचा परिणाम बाबुरावजीवर होत नव्हता.एकच उद्दिष्ट ! एकच ध्यास ! माझा आदिवासी समाज ! त्यांच्या समाजसेवेची दखल शेवटी कॉँग्रेस पक्षाने घेतली व १९७२ ला आरमोरी निर्वाचन या राखीव मतदार संघातून विधानसभेची तिकीट मिळाली व ते भारी बहुमताने निवडुन आले.
विधानसभा हे त्यांनी पहील्यांदा अनुभवली होती.सर्वच नवीन होत त्यांच्यासाठी ! पण आदिवासी समाजाचे प्रश्न मांडण्याची संधी त्यांना गमवायची नव्हती.ते सतत विधानसभेत हजर राहून इतर वरिष्ठ आमदारांना प्रश्न करताना एकाग्रतेने अभ्यास करायचे. प्रश्न कसे मांडायचे, त्यांची पद्धत त्यांनी अल्पकाळातच हस्तगत केली. विधानसभेतील त्यांचा पहिला प्रश्न पटलावर आला, “तो वनाधिकार व वनविभागाची उदासिनता या विषयावर होता” तेंव्हा वसंतदादा पाटीलांसारखे दिग्गज मुख्यमंत्री सभागृहात उपस्थित होते. यांच्या प्रश्नाची धार, अमोघ वाणी व त्यामागचा अभ्यास पाहून ते अत्यंत प्रभावित झाले. मंत्रीमंडळ विस्तारात 1978 मध्ये त्यांनी बाबुरावजींना सार्वजनिक बांधकाम व समाजकल्याण खात्याचा कार्यभार सोपविला. त्यांच्या विश्वासावर बाबुरावजी खरे उतरले, व मुख्यमंत्री वसंतदादा पाटीलसाहेबांचे प्रिय मंत्री म्हणुन नावरूपाला आले. मंत्री या नात्याने त्यांनी अनेक विकासकामे केलीत. पण आदिवासी समाजासाठी विशेष म्हणजे समाजकल्याण विभागापासून आदिवासी विभाग वेगळा केला, व त्याचा स्वतंत्र बजेट निर्माण केला.
नंतरच्या मंत्रीमंडळात त्यांची वर्णी लागली नाही. आमदार म्हणून अधिक जोमाने ते विधानसभेत आदिवासी समाजाचे प्रश्न मांडत राहिले.
गडचिरोली जिल्हाची निर्मिती करतांना त्यांना अनेक दिग्गज राजकारण्यांचा विरोध पत्करावा लागला, परंतू त्यांनी कोणाची पर्वा न करता चंद्रपुरपासून गडचिरोली जिल्हा वेगळा केला व त्याला आदिवासी जिल्हा म्हणून मान मिळवून दिला. त्याकाळी आदिवासींच्या जमिनी इतर समाजाने बळकावल्या,व सर्रास लूट करायचे यासाठी ठोस कायदा नसल्याने ते खूप अस्वस्थ झाले. त्यांनी 14 दिवस संसदेसमोर आमरण उपोषण केले.त्यांची तब्येत खूप खालावली.रक्तचाप कमी झाला. शेवटी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींना निरोप पाठविण्यात आला की, निर्णय न घेतल्यास यांचा मृत्यु होऊ शकतो,तेंव्हा त्या स्वत: आल्यात व बाबुरावजींना जमीन हस्तांतरण कायदा (LAND RESTORATION ACT) करण्याचे वचन देऊन त्यांचे उपोषण सोडविले.
1976 च्या काळात आदिवासी समाजाचे जात प्रमाणपत्र फक्त गडचिरोली जिल्ह्यातून प्राप्त करावे लागत असे. उदा.गडचिरोली जिल्ह्याचा मडावी आदिवासी व इतर जिल्ह्याचा मडावी नाही. हा कायदा बाबुरावजींना खुप जाचक वाटला.
पुन्हा त्यांनी संसदेसमोर उपोषण सुरू केले, क्षेत्रबंधनाची (AREA RESTRICTION) अट रद्द करण्यासाठी त्यांना यावेळी 16 दिवस आमरण उपोषण करावे लागले.
क्षेत्रबंधन हटविण्याचा फायदा आदिवासी समाजाला निश्चितच झाला, परंतू एक नवीन आकस्मिक संकट निर्माण झाले. कोष्टी समाजाने हलबा समाजाची जातप्रमाण पत्र मिळवून आदिवासींच्या हक्कांवर अतिक्रमण करण्यास सुरवात केली. बाबुरावजींना दूरदृष्टीने याचे आदिवासी समाजावर होणारे दुरगामी परिणाम धान्यात आले. त्याचा प्रतिकार करण्यासाठी त्यांनी शिष्टमंडळ निर्माण करून राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल मानवधिकार आयोग, अनु.जाती-जमाती आयोग सर्व संविधानिक व्यक्तींकडे निवेदन केली, परंतू आर्थिकरित्या या सक्षम जातीने अक्षरश: बाबुरावजींच्या सर्व प्रयत्नांना अपयशी ठरविले.
पुन्हा वयाच्या 70 व्या वर्षी त्यांना आमरण उपोषण करावे लागले ते यासाठी कि, या बोगस जाती विरूद्ध महाराष्ट्र शासनाने सर्वेाच्च न्यायालयात याचिका दाखल करावी म्हणुन !
मिलिंद कटवारे विरूध्द महाराष्ट्र शासन ही केस सुप्रीम कोर्टात दाखल झाली. परंतू बाबुरावजींना सुगावा लागला कि,कोष्टी समाजाने पैश्याचा भडीमार करून महाराष्ट्राच्या मंत्र्यांना व अधिकारी वर्गाला विकत घेतले. व आतून महाराष्ट्र शासनाच्या वकील ही कोष्टी समाजाला विकला गेला. त्याकाळात बाबुरावजींनी स्वता: आदिवासी विकास परिषदेला इंटरविनर करून घेतले.त्यावेळी सोली सोराबजी हे प्रख्यात वकील त्यांनी केस हरायची नाही म्हणून उभा केला,पण तो एका सुनावणीचे 2 लाख रूपये घेत असे. बाबुरावजी आदिवासी समाजाला वाचविण्या साठी आदिवासी आमदार,खासदार, मंत्री व केंद्रीय मंत्र्यांसमोर अक्षरश: भीक मागितली.
“आदिवासी समाजासमोर हे मोठं संकट आहे, आज एक कोष्टी समाज आदिवासी समाजामध्ये अतिक्रमण करित आहे. भविष्यात कितीतरी जाती येतील.ही केस जिंकायचीच आहे.” ही केस जिंकली तर बाबुरावजींचे नाव ह्याचा रूतबा वाढेल. आमचा मान कमी होईल.या स्वार्थी विचारापायी कोणी बाबुरावजींची मदत केली नाही.त्याकाळच्या सर्व नेत्यांनी थोडीसुद्धा समाजासाठी आत्मियता दाखविली असती तर आज आदिवासी समाजात कोष्टी, ,माना ,गोवारी सारखे घुसखोर शिरले नसते व धनगर किवा मनेर्रवार आदिवासीच्या ऊरावर बसण्यासाठी सज्ज झाले नसते. बाबुरावजी भयंकर निराश झाले, रडले. पण खचले नाही. जीवनभर नाव कमावलं, संपत्ती नाही. आदिवासी समाजाच्या नावाने कोट्यावधी रूपये कमावून समाजावर संकट आले असतांना एक पैसा न काढणाऱ्या खासदार,आमदार व मंत्री यांची चीड आली, पण त्यांचा द्वेष त्यांनी कधीही बाळगला नाही. बॅरिस्टर अंतुले मुख्यमंत्री असतांना त्यांनी आमदारांना वरळी सी-फेसवर सर्व आमदारांना फ्लॅट दिले होते. त्यांच्या परिवाराच्या हक्काची संपत्तीसुद्या आदिवासी समाजाच्याप्रेमापोटी 35 लाख रूपयाला विकली, ज्याची आज किंमत 25 कोटी आहे.ती विकुन वकीलाची फी दिली, व सुप्रीम कोर्टात केस जिंकली. या समाजवेड्या नेत्याने आपले संपुर्ण आयु्ष्य समाजासाठी दिले.
अ.भा.आदिवासी विकास परिषद ह्या राष्ट्रीय संघटनेची स्थापना महाराष्ट्रात केली.अख्खा महाराष्ट्रातील आदिवासी समाज या संघटनेला जोडला. 9 राष्ट्रीय अधिवेशनं नागपूरला घेतली. महाराष्ट्राचा कोणताच मुख्यमंत्री बाकी ठेवला नाही जो बाबुरावजींच्या आयोजित कार्यक्रमाला आला नाही. असा कोणता मुद्दा नाही जो बाबुरावजींनी उचलला नाही. 9 बोगस नगरसेवक नागपुर महानगर पालिका निवडणुकीत निवडून आले. त्यांना त्यांच्या पदावरून खाली खेचण्याचा विश्वविक्रम बाबुरावजींनी करून दाखविला.
नागपुरातील हिवाळी अधिवेशन आणि बाबुरावजींचा मोर्चा हे समीकरण आदिवासी समाजाला पाठ झाले होते. आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी त्यांनी संपुर्ण महाराष्ट्रात लाखोंचे मोर्चे व अधिवेशनं आयोजित केली. महाराष्ट्र व इतर राज्यातही आदिवासी समाजाला न्याय देण्यासाठी संपुर्ण भारतदेश पिंजून काढणारा तो एकमेव आदिवासी नेता होता. महाराष्ट्रात कदाचितच असे गाव असेल ज्या गावात बाबुरावजींचा कार्यकर्ते नसतील. “समाजाने मला काय दिले, यापेक्षा मी समाजाला काय देऊ शकतो”हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे. कारण समाजाने मला ओळख दिली आहे, त्यामुळे माझे अस्तित्व आहे. हे ऋण मला फेडायचे आहे.ज्याला याची जाणीव आहे, तो समाजाचा सच्चा कार्यकर्ता व घटक आहे” हा संदेश देणारे बाबुरावजी आज आमच्यात नाही.आपल्या कर्तृत्वाने ते आमच्या ह्रदयात नेहमीसाठी अजरामर आहेत व सदैव राहणार. आदिवासी बांधवांनो आज परिस्थिती याहीपेक्षा बिकट आहे. म्हणून धर्मवाद, जमातवाद, पक्षवाद , सत्तावाद, भाषावाद, नीतीवाद, संघटनवाद किंवा कुठल्याही स्वार्थवादा पलीकडे जाऊन आम्हाला बाबूरावजी मडावी यांच्या चरित्राला समझुन सामाजिक एकोपा प्रस्थापित करणे गरजेचे झाले आहे. तरच आजचा बोगस व आदिवासी अधिकाराचा प्रश्न सुटेल. मान्य आहे की, बाबूरावजी मडावी पुन्हा तर जन्म घेणार नाही पण बाबूरावजीचा मार्ग तर आमच्या आदिवासी लढ्याची वाट आहे.