पुरवठा दारांचे एक करोड पासष्ठ लाख तात्काळ देण्यात यावे – प्रविण चिचघरे
संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:- जिल्हातील पोंभुरणा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीने रोहयो अंतर्गत अकुशल कामासाहित कुशल कामे करवून घेतली आहे. मात्र पुरवठादारांना साहित्य पुरवठ्याचा एकही पैसा न मिळाल्याने ग्रामपंचायतच्या विकास कामावर विपरीत परिणाम होत असल्याने श्रमिक एल्गारचे अध्यक्ष प्रविण चिचघरे यांनी थेट मंत्रालयात धाव घेतली. मंत्रालयात चिचघरे यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वनमंत्री सुधिर मुनगंटीवार, तसेच रोजगार हमी योजनेचे मंत्री संदीपाणराव भुमरे यांची भेट घेऊन तालुक्यात रोजगार हमी योजनेचा कुशल कामाचा निधी मंजूर करून कुशल कामे पूर्ण करण्यात आलेल्या ग्रामपंचायतीना थकीत असलेला एक करोड पासष्ठ लाखाचा निधी तात्काळ देण्यात यावा अशी मागणी निवेदनातून केली आहे.
कुशल कामाचा निधी न दिल्याने याचा थेट विकास कामावर परिणाम होत असल्याचे निवेदनात चिचघरे यांनी सांगितले आहे. साहित्य पुरवठा दारांना पुरवठा केलेल्या साहित्याचा एकही पैसा न दिल्याने पुरवठादार साहित्य पुरवठा करण्यास नकार देत असून यामुळे ग्रामपंचायती विकास कामे करण्यास असमर्थ होत आहेत
आंबेधानोरा, उमरिपोतदार,सातारा भोसले, बोर्डा बोरकर, जाम खुर्द, फुटाना, आष्ठा, कसरगटा, नवेगाव मोरे, चिंतालधाबा, घटकूल, केमरा, या ग्रामपंचायतीने पांदण रस्ता खडीकरण, सिमेंट कंक्रीट रोड, अन्न धान्य साठवणूक इमारत इयादी कामे पूर्ण केली असतांना निधी मात्र दिल्या गेला नाही असेही त्यांनी प्रामुख्याने लक्ष चिचघरे यांनी वेधले आहे.
पोंभुरणा तालुक्यातील ग्रामपंचायतींना कुशल कामाचा निधी तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा अशी चिचघरे यांनी निवेदनातून मागणी केली आहे.

