सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
बल्लारपूर:- येथील अंगणवाडी व नगर परिषद क्षेत्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील वर्ग 8 वी पर्यंतच्या 3200 विद्यार्थ्यांना मध्यानांचे भोजन बनवून देण्याचे कार्य 28 महिला बचत गटांच्या 140 महिला 15 वर्षापासून अल्पशा मानधनावर काम करीत आहेत. गरीब महिलांना रोजगार मिळावा, त्या स्वावलंबी व्हाव्या असे शासनाचे धोरण असतांना, नगर परिषद बल्लारपूर तर्फे शालेय पोषण आहार पुरवठा करण्याचा कंत्राट युवक कल्याण बेरोजगार सेवा सहकारी संस्थेस दिला आहे. त्यामुळे सदर कामावर अवलंबून असलेल्या 100 परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे.
याबाबत बसपाचे नेते श्री सरफराज शेख, शहराध्यक्ष आसिफ शेख, बल्लारपूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष श्री भारत थुलकर, सचिव संजय डुंबेरे यांनी न.प बल्लारपूरचे प्रशासकीय अधिकारी श्री अजित डोके यांची भेट घेऊन युवक कल्याण बेरोजगार संस्थेस दिलेला कंत्राट रद्द करून, पूर्वी प्रमाणे जुन्या महिला बचत गटानांच शालेय पोषण आहार पुरवठा करण्याचे काम देण्यात यावे. अशा मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनाची दखल न घेतल्यास, बसपा व बल्लारपूर शहर विकास आघाडी तर्फे दि.6 सप्टेंबर 2022 चे सकाळ 10 वाजेपासून न.प कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलन प्रारंभ करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

