उपविभागीय अधिकाऱ्यांकडे काँग्रेसच्या वतीने नागरिकांचे निवेदन सादर.
संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यातील शेतकरी, कामगार व सर्वसामान्य नागरिक सध्या विविध ज्वलंत समस्यांनी त्रस्त झाले असून, त्या समस्यांच्या तात्काळ निराकरणासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात गोंडपिपरी तालुका काँग्रेसच्या वतीने नागरिकांचे निवेदन उपविभागीय अधिकारी, गोंडपिपरी यांना सादर करण्यात आले.
यावेळी नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. शेतपिकांचे तात्काळ पंचनामे करून सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. तसेच, वीजपुरवठ्यासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना तातडीने जोडणी देण्यात यावी, रेतीघाटांवरील अवैध उत्खनन तत्काळ थांबवावे, अशी नागरिकांची ठाम मागणी काँग्रेसने केली आहे.
ग्रामीण भागातील जागेअभावी रखडलेल्या घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना ५०० चौ.मी. जागा उपलब्ध करून द्यावी, गोंडपिपरी शहरातील मानव वस्तीजवळील घनकचरा संकलन केंद्रामुळे नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी ते केंद्र तात्काळ हलवावे, इंदिरा नगर व इतर परिसरातील नागरिकांना मालकीहक्काचे पट्टे देण्यात यावेत, अशा मागण्या देखील निवेदनात मांडण्यात आल्या. याशिवाय, संविधान चौक ते धाबा रोड पर्यंत सुरू असलेल्या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करणे, ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम व बंद असलेली सोनोग्राफी मशीन तात्काळ सुरू करणे, विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरू करणे आणि ग्रामीण भागातील पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करणे या तातडीच्या उपाययोजनांवर प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून तातडीने ठोस कारवाई करावी अन्यथा जन आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देविदास सातपुते, शहराध्यक्ष राजु झाडे, युवक तालुकाध्यक्ष विपिन पेंदुलवार, अशोक रेचणकर, शुभम पिंपळकर यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

