महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन संगमनेर:- तालुक्यातील वडदरा (बोटा) येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. येथील उत्तम बाळाजी कुऱ्हाडे वय 62 वर्ष यांच्या वर बिबट्याने घरात घुसून हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यूू झाला. ही घटना शनिवारी रात्री 8.15 वाजताच्या सुमारास घडली. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पठार भागात बिबट्याचे मानव वस्तीवर येण्याचे प्रमाण वाढले आहे. बोटा-अकलापूर रोडवरील वडदरा येथे वास्तव्यास असलेले उत्तम कुऱ्हाडे हे रात्रीच्या वेळी घरात टीव्ही पाहत होते. घराचा दरवाजा उघडा असल्याने परिसरातच दबा धरून बसलेल्या बिबट्याने काही कळायच्या आत त्यांच्यावर घरात घुसून हल्ला चढविला. मानेचा घोट घेत त्यांना जागीच ठार केले. त्यांच्या आईने जोरजोरात आरडाओरड केल्याने मृतदेह टाकून बिबट्याने पळ काढला. परिसरातील नागरिकांनी याच घटनेची माहिती वन विभागाला दिली.
दरम्यान , वनरक्षक डी.बी.कोरडे, एस.पी.सातपुते, वनसेवक बाळासाहेब वैराळ, आनंथा काळे यांनी घटनास्थळी पोहचून त्यांनी या घटनेची माहिती घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला. बिबट्याच्या हल्ल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. वारंवार बिबट्याचे हल्ल्याने शेतकरी वर्ग हैराण झाला असून रात्रीची शेतीची कामे कसे करायचे हा प्रश्न उभा राहिला आहे. बिबट्याचा वावर पूर्वी होता मात्र, आता तो मोठ्या प्रमाणात वाढला असून बिबटे माणसांवरही हल्ले करु लागले असल्याने वनविभागाने गावोगावी पिंजरे लावावेत अशी मागणी संगमनेर पठारभागातील नागरिकांनी केली आहे.

