✍️ लेखिका: सरिता सातारडे, राह. नागपूर साहित्यिक व विचारवंत
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन विशेष लेख:- खेमराज भोयर या जमीनीशी नाळ घट्ट जुळून असलेल्या विद्रोही कवीचा ‘सालं अतीच झालं’ हा काव्यसंग्रह नुकताच पूर्ण वाचून काढला. खरं तर मला लिहायला उशीर होतो आहे पण तरीही दादांच्या संग्रहावर लिहायचे आहे ही आधीपासून मनाशी खुनगाठ होतीच म्हणून लिहिण्याचा हा प्रपंच. वयाच्या आठव्या वर्षापासून कविता लिहिणारा हा अवलिया अतिशय संवेदनशील, पारखी नजर असलेला. समाजजीवनातील प्रत्येक गोष्टीकडे कवीचे सुक्ष्म निरिक्षण आहे. म्हणूनच तो विसंगती विरोधात घणाघाती टीका ही करतो आहे.
हा कवी आपल्या मनोगताच म्हणतो, “साहित्यिकांमध्ये भिकारचोटपणा नसावा. साहित्य वेदनेने भरलेले असावे. वैज्ञानिक दृष्टिकोन असावा. साहित्यात बदलायची ताकद असावी. म्हणजेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे सुटाबुटातील, टायकोटातील देखणे रूबाबदार साहित्य असावे, ही माझी प्रामाणिक इच्छा.” इतक्या सुंदर शब्दात साहित्याची परिभाषा की प्रत्यक्ष साहित्यालाच डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तीमत्वाची उपमा द्यावी हे अजून तरी माझ्या वाचण्यात आले नाही म्हणून कवी या रूपात खेमराज भोयर दादा मला वेगळे भासतात.
‘चळवळ’ या आपल्या रचनेत कवी म्हणतो,” बाबासाहेब हुशार लयलगेच सवाल केला मले, सांग म्हणे माया चळवळीच्या रथाचे काय झाले? “आंबेडकरवादी चळवळीची व्यथा आणि वेदना कवी इथे मांडतो…. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे ते प्रसिद्ध वाक्य ही आठवते….”माझ्या लोकांना सांग की, जे काही मी केले आहे ते मी अत्यंत हालअपेष्टा आणि आयुष्यभर दुःखे भोगून आणि माझ्या विरोधकांशी लढून मी ते मिळविले आहे. महत् प्रयासाने हा काफिला जेथे दिसतो आहे तेथे आणून ठेवला आहे. मार्गात कितीही अडचणी आणि संकटे आली तरी तो काफिला आता मागे फिरता कामा नये. जर माझ्या सहकाऱ्यांना तो काफिला पुढे नेता येत नसेल तर तो तेथेच त्यांनी ठेवावा. पण काही झाले तरी तो मागे नेता कामा नये हाच माझ्या लोकांना माझा संदेश आहे.”(नानकचंद रट्टू ना बाबासाहेबांनी सांगितलेला संदेश. संदर्भ – डॉ भीमराव रामजी आंबेडकर चरित्र खंड-11)आंबेडकरवादी चळवळीच्या रथाचे चाक स्वार्थी नेत्यांमुळे, स्वार्थी लोकांमुळे कुठेतरी रूतलेले आहे याचे शल्य कवीला आहे. अनेक गटातटात विभागलेल्या आंबेडकरी समाजाला आता कोणीही वाली नाही याची खंत सर्वांनाच आहे. पण एकीचे सुत्र जमत नसल्याने सदोदित बेकीच करित राहिलो आणि म्हणूनच आज अशा विदारक परिस्थितीत पोहोचलो आहोत.
‘उध्वस्त होता होता’ या रचनेत कवी म्हणतो, “काॅम्रेड ! तू इथल्या व्यवस्थेच्या भट्टीत जणू तावूनसुलाखून निघालास अन् ही व्यवस्थाच तुझ्यासमोर पासली झालीतू वर ती खाली. “आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याचे जगणे कफल्लक असले तरीही त्याच्या नजरेतील दाहक अंगारच जणू त्याला काॅम्रेड बनवितो. उघड्यावर संसार मांडणारा हा माणूस नशीबाचे भोग घेऊन जगत असला तरी लाथ मारील तिथे पाणी काढेल हा करारी बाणाही त्याच्याकडे आहे. दुःखाच्या अग्नीत तावूनसुलाखून निघणारा हा काॅम्रेड आहे आणि म्हणूनच.. “आकाशाला बाप… व्यवस्थेला थाप.. कस आपोआप घडत गेल.” असेही हा कवी स्वःअभिमानाने सांगतो…
‘जात वंश वगैरे’ या रचनेत कवी प्रतिगाम्यांना काल्पनिक सतयुगातून बाहेर पडण्याचे आवाहन करतो. गाईला माता आणि बैलाला पिता करण्याच्या नादात तू माणसातील माणूसकीला पारखा झाला आहेस. जनावरांच्या दोन जाती एक पाळीव आणि दुसरी जंगली.. सांग तू यामधील कुठल्या वंशाचा आहेस? असा जळजळीत सवालही कवी प्रतिगाम्यांना विचारतो. ‘माझ्या मूला’ ही अतिशय संवेदनशील आणि अर्थगर्भित रचना आहे. यात कवी म्हणतो, “माझ्या मूलामाझं एकच सांगण तुलाशिक्षणाच्या परिक्षेत नापास झालास फरक पडत नाही आयुष्याच्या परीक्षेत नापास होण्यासाठी तुलामोकाट सोडत नाही” “वाघ बन, नाग बन मनूला जाळणारी आग बन झेपलेच तर बुध्दासारखा त्याग करणारा बन. वाचत रहा, वाचत रहाहाती लागेल ते ते तुला वाटते तू ते करफक्त माणुसकी असलेलामाणूस हो भला! “कवी आपल्या मूलाला माणूसकीच्या पाठशाळेत शिकायला घालतो आणि तिथे त्याने कुठले शिक्षण घ्यावे याचे जणू मार्गदर्शन ही करतो. फक्त अभ्यासू किडा नाही तर माणसाला माणूस घडविणारा एक आदर्श मूलगा तू बन हेच कवी इथे सांगू इच्छितो. आपल्या मूलाला तथागत बुध्द, क्रांतीबा जोतिबा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी जगलेल्या जीवनाचे दर्शन घडवितो आणि त्यांच्या जीवनदर्शनातून तूला योग्य ते तू घे असा आशिर्वाद ही देतो.
विशेष कौतुक म्हणजे खेमराज दादांचा मूलगा शृंखल याचा इंग्रजी काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. ‘चौथा स्तंभ’ या रचनेत कवी म्हणतो, “कसा कोसळला चौथा स्तंभ मुकी… रे, नाही हाक अन बोंब चोरांचे भाट, त्यांचे सुरू सुतिपाठसंपत्तीला तुमच्या कसे फुटलेत कोंब.” लोकशाहीचा चौथा स्तंभ कसा कोसळला याचे वर्णन कवी इथे करतात. पध्दतशीरपणे या देशातील लोकशाही संपवून हुकूमशाही कडे या देशाला प्रस्थापित व्यवस्था घेऊन जात आहे आणि यांना पूर्णपणे साथ देत आहे. लोकशाहीचा हा चौथा स्तंभ. लोकशाहीच्या स्तंभाचे कार्य असते वर्तमान सरकारमधील विसंगती जनतेसमोर आणणे. परंतू लोकशाहीचे चिरहरण करण्यात सज्ज असलेला हा स्तंभ आज भाटगिरी करित आहे. साऱ्याच प्रसारमाध्यमांवर सरकारचा कब्जा असल्याने लोकशाही आज कशी रडत आहे याचे चित्रण कवी इथे करतात.
‘बोलती बंद’ या रचनेत कवी म्हणतो, सिध्दार्था, तू नाकारलेस वैभवअन लोकशाहीचा पाया उभा राहिला. तू चाललास, चालतच सुटलास अन् सत्याचा मार्ग शोधलास. “रक्तविहीन क्रांतीचा प्रणेता तथागत बुध्द ज्याने राजवैभवाला ठोकर मारली आणि माणसाच्या जीवनातील दुःखे, दुःखांची कारणे, कारणांवरील उपाय शोधून सर्व मानवप्राण्यांना दुःखमुक्त केले. शोषित, पिडित जनतेचा आधारवड बनून क्रांती करणाऱ्या बुध्दाने प्रतिगाम्यांच्या आत्मा, पुनर्जन्म, देव या सर्वांचीच हवा काढून सर्वांची बोलतीच बंद केली आहे.
भारतात कायद्याचे युग सुरू होऊन सत्तर वर्षांचा काळ लोटला असला कायद्याने जातीगत भेदभावावर कायदेशीर बंदी असली तरीही मनातील जळमटे दूर करण्यास सनातनी तयार नाहीत अशांची पोलखोल करतांना ‘खोले’ ची पोलखोल’ या रचने मध्ये जातीव्यवस्थेच्या दाहक व्यवस्थेवर कवी तीक्ष्ण प्रहार करतो आणि म्हणतो, “तूमच्या श्वासावर जगणाऱ्या घासावरकर ना दाखल यावर एखादा एफआयआर अन् होऊन जाऊदे एकदाची लढाई आरपार.” ‘सालं अतीच झालं’ या रचनेत कवी म्हणतो, “बंद केलं आता तुमच्यासाठी पिकवणं तुम्ही दगड, सिमेंट, गिट्टी, रेती खापेट्रोल, डिझेल, तेल प्याकोळसा – माती खाजनतेचं सपन खासैनिकाचं कफन खाशेतकऱ्यांचा चेक खा. ‘आता देणं-घेणं बंद!’ पुढची लढाई मताची आम्ही आता सज्ज आहोत निवडणुकीच्या मैदानात.”देशात घडणारे हे सारे अघटित, ही बेबंदशाही, ही दडपशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे हणन या सर्वच गोष्टीनी त्रस्त होऊन कवी म्हणतो की ‘सालं आता अतीच झालं’ आता पुढील भेट निवडणूकीच्या रिंगणात. तेच एक माध्यम सामान्य व्यक्तीजवळ आहे, ‘एक मत एक मूल्य’ भारतीय संविधानाने दिलेले हे औजार आहे ज्याआधारे अशा तानाशाहीला आपण वठणीवर आणू शकतो.
फुले, शाहू, आंबेडकर, शिवाजी महाराजांचा वारसा जपणारा हा कवी आहे. अन्यायाविरुद्ध पेटून उठून ती रखरख काव्यरूपात मांडणारा हा कवी आहे या संग्रहात एकून सामाजिक जाणीवेने ओतप्रोत भरलेल्या ९६ कविता आहेत.डाॅ यशवंत मनोहर सरांसारख्या आंबेडकरवादी साहित्यातील महामेरू असणाऱ्या विचारवंताची प्रस्तावना या काव्यसंग्रहास मिळाली आहे. ‘जळत्या वर्तमानाला पर्याय देणारी कविता’ या शब्दात यशवंत मनोहर सर खेमराज दादांचा गुणगौरव करतात. लोकनाथ यशवंत सरांसारखे मात्तबर कवी म्हणतात की, ‘सांगणे वेगळे नि वागणे वेगळे’ ही फसवेगिरी खेमराज भोयर यांच्या निकोप दृष्टितून सुटत नाही. ते या भंकसगिरीवर सतत प्रहार करतात आणि त्याच्याच कविता होतात.
“सागर सरहद्दी सर म्हणतात,” या कविता उद्याच्या क्रांतीच्या उठावाच्या वेळेस शस्त्र बनून व्यवस्थेच्या चिंधड्या करेल या शंका नाही.मुखपृष्ठ श्रीधर अंभोरे यांचे असून मुद्रितशोधन दीपक रंगारी यांनी केलेले आहे. एकंदर हा कवितासंग्रह म्हणजे खेमराज दादांनी जीवनातील पाठशाळेत घेतलेला अनुभवांचा डोंगरच आहे. सभोवारचे सुक्ष्म निरिक्षण, चिंतन, मनन करून लिहिलेल्या या रचनांमध्ये कमालीचा विद्रोह, प्रसंगी राकड भाषा, संवेदनशीलता आणि दाहक वास्तविकतेचे अनुपम मिश्रण वाचावयास मिळते. अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेला हा काव्यसंग्रह सर्वांनी संग्रही ठेवावा असाच आहे. खेमराज दादांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक सदिच्छा देते आणि अशाच प्रखर रचनांनी झोपलेल्या लोकांना सदोदित जागवित राहाल याच सदिच्छेसह..
आपल्या परिसरातील बातम्या आणि घडामोडी बघडण्याकरिता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

