ईसा तडवी जळगाव उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जळगाव:- शहरातील समतानगर भागातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची ही घटना शनिवारी सकाळी समोर आली आहे. त्यामुळे सर्वच स्तरावरून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. तरी कुठल्याही अफवांना नागरिकांनी बळी पडू नये आणि कुणीही अफवा पसरवू नका, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
आज सकाळच्या सुमारास जळगाव शहरातील समतानगर परिसरात असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची समाजद्रोही कडून विटंबना करण्यात आली. याची माहिती सर्वत्र पसरताच समतानगर येथे बघता बघता एकच गर्दी जमा झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून जनभावना तीव्र निषेध करण्यात येत आहे. यावेळी पोलिस सह सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या वतीने शाततेचे आव्हान केले.
शहरातील समतानगर भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. शनिवारी सकाळी पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचे परिसरातील रहिवाशांच्या निदर्शनास आले. यामुळे त्यांनी पुतळ्याच्या ठिकाणी धाव घेत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. समतानगर भागातील सर्वच धर्मीय समाजबांधव आक्रमक झाले आहेत. पुतळ्याच्या ठिकाणी समाजबांधवांनी ठिय्या दिला. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
एका संशयित ताब्यात: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना प्रकरणी एक संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचाकडे चौकशी सुरू आहे.
पुतळ्याची विटंबना करणार्यांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी समाजातील आबालवृद्ध आक्रमक झाले असून, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे, अनिल अडकमोल, दिलीप सपकाळे आदींनी समाज बांधवांशी संवाद साधत शांततेचे आवाहन केले आहे.
जळगावात सर्वधर्मीय बांधव एकोप्याने राहत असलेल्या या समतानगराला डॉ. बाबासाहेब पुतळा विटंबनाने गालबोट लागले असून, यातील दोषींवर कारवाई करावी आणि याच्या मुख्य सूत्रधाराला तत्काळ अटक करावी, अशी आमची मागणी आहे. अशी घटना या ठिकाणी पहिल्यांदाच घडली आहे. त्यामुळे ३८ वर्षांत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची गरजच भासली नाही. सर्व जाती-धर्माचे लोक या ठिकाणी एकोप्याने राहतात; परंतु कोणी समाजकंटकाने पुतळ्याची विटंबना केली आहे. घटनेची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. या घटनेमुळे समतानगराला गालबोट लागले आहे, याचा आम्ही सर्व समतानगरवासी निषेध करतो, असे त्यांनी सांगितले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

