विश्वास तिभूवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहमदनगर:- जिल्हा दुहेरी हत्याकांडाने हादरला आहे. राहुरी तालुक्यातील कात्रड गावातून हे खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे कौटुंबिक वादातून पतीने आपल्या पत्नी आणि सासूची हत्या केली. ही घटना मध्यरात्री घडली. पत्नी व सासू झोपेत असताना त्यांच्या डोक्यात लोखंडी पहार घालून हत्या केली. नूतन सागर साबळे आणि सासू सुरेखा दिलीप दांगट अशी मयत माय-लेकींची नावे आहेत. हत्येनंतर आरोपी पती फरार झाला आहे. सागर सुरेश साबळे असे फरार आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.
प्राप्त माहितीनुसार आरोपी सागर साबळे याचा आपल्या पत्नी आणि सासू बरोबर कुटुंबीक वाद होता. हा वाद विकोपाला गेला. याच रागातून सागरने मध्यरात्री झोपेत असताना सासू आणि पत्नीच्या डोक्यात लोखंडी पहार घालून त्यांची हत्या केली. हत्येनंतर सागर पळून गेला. सकाळी सागरचा भाऊ उठला तर वहिनी आणि तिची आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्याने राहुरी पोलिसांना घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी पोहचले असून, आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली आहेत. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. पती-पत्नीत नेमका काय वाद होता, याचाही पोलीस तपास करत आहेत.

