✒️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनधी
नाशिक :- जिल्हात गणरायाच्या आगमनाने सर्वत्र उत्साह दिसून येत आहे. मात्र जोरदार पाऊसाने त्यात खल टाकला आहे. काल रात्रभर चाललेल्या मुसळधार पावसाने पहाटे अचानक गोदावरी नदीस पूर आल्याने रामकुंड येथील गांधी ज्योत जवळ झोपलेले चौघे जण पाण्यात वाहून चालले होते. मात्र जीवरक्षक व अग्निशामक दलाच्या प्रयत्नाने चौघांना बाहेर काढण्यात यश आले.
रात्रभर शहरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे पहाटेच्या सुमारास गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता. रामकुंड परिसरातील गांधी ज्योत परिसरात झोपलेल्या चार बेघर व्यक्ती वाहून चालल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली होती. मात्र जीवरक्षक व अग्निशामक दल यांच्या तत्परतेमुळे या चौघांनाही पुराच्या पाण्यातून सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आले. दरम्यान, शहरात पावसाचा जोर वाढल्याने गंगापूर धरण परिसरात सातत्याने पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे सतर्कतेच्या दृष्टीने मनपाच्या अग्निशामक विभाग व आपत्कालीन विभाग यांच्याकडून सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात आली असून, त्यादृष्टीने कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली.