मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पावसाळ्याच्या दिवसात साचलेल्या पावसाच्या पाण्यातून डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यू, मलेरिया व हत्तीरोगाचा प्रसार होण्याची शक्यता असते. या किटकजन्य रोगांना आळा घालण्यासाठी व डासांची उत्पत्ती नियंत्रित करण्यासाठी हत्तीरोग विभाग व हिवताप विभाग उपजिल्हा रुग्णालय द्वारा गप्पी मासे विशेष मोहिम राबविली जात आहे.
पावसाळा तोंडावर आला कि सोबतच डेंग्यू, मलेरिया सारखे रोग तोंड वर काढतात. याला मुख्यतवे कारण म्हणजे पावसाचे साचलेले पाणी, डबकी व इतर साठवणुकीतील पाण्याचे स्रोत होय. अशा स्वच्छ पाण्यामध्ये डास आपली अंडी घालतात व डासांची पैदास होऊन कीटकजन्य रोगाची वाढ होते. अशा ठिकाणी गप्पी मासे सोडल्यास डासांची पैदास नियंत्रणात येण्यास मदत होते.
त्यामुळे डासांची पैदास नियंत्रित करण्याच्या दृष्टीने जिल्हा हिवताप अधिकारी सौं. जयश्री थोटे यांच्या मार्गदर्शनात व डॉ. चाचरकर, अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट यांच्या नियंत्रणात हिवताप व हत्तीरोग विभाग हिंगणघाट द्वारा विशेष गप्पी मासे मोहीम राबविण्यात येत आहे.
हिवताप व हत्तीरोग पथकामार्फत क्षेत्र निहाय शहरातील विविध भागात सर्वेक्षण करून डासोत्पती स्थानाची पाहणी तसेच यादी करून या स्थानात गप्पी मासे सोडण्यात येत आहे. तसेच शहरातील वॉर्डानिहाय आरोग्य कर्मचारी यांची पथके तयार करून प्रत्येक घरातील दूषित कंटेनर सर्वेक्षण करण्यात येत आहे व डेंग्यू विषयी जनजागृती करण्यात येत आहे. या मोहिमेत हत्तीरोग विभागाचे उमेश मेश्राम, आरोग्यसेवक, कीटक समहरक राम मेश्राम, आरोग्य कर्मचारी अमोल कुमरे, सुभाष वडगे, सचिन खंदार, शुभम गावंडे क्षेत्रीय कर्मचारी तसेच हिवताप विभागाचे मिलिंद डोनारकर आरोग्य सहाय्यक, आरोग्य कर्मचारी डकाराम मेश्राम, असलम फारुकी, अवैद्यकिय सहाय्यक प्रशांत जंगठे तसेच शहरी भागातील आशाताई, नगरपरिषद सहाय्यक करत आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

