मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंदू साम्राज्य निर्माते, सनातन हिंदू धर्माचे रक्षक, संवर्धक, राष्ट्रीय प्रेरणेचे अखंड स्रोत असलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेचे हे ३५० वे वर्ष. आपल्या धर्मशील आचरणाने, राष्ट्रीय विचाराने, प्रेरक कृतीने, जगभरातील हिंदूंना गेली साडेतीनशे वर्ष स्वातंत्र्याची अव्यहात ऊर्जा प्रदान करणाऱ्या छत्रपती श्री. शिवरायांच्या शौर्याचे स्मरण करणारे, त्यांच्या तेजस्वी पराक्रमाचे जागरण करणारे, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे हे वर्ष.
श्री शिवछत्रपतींच्या विचारांचा वारसा पुढे नेणारी जागतिक हिंदूंचे बलशाली संघटन असणारी विश्व हिंदू परिषद यावर्षी आपल्या स्थापनेचे हीरक महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. हिंदुत्वाचा हुंकार जागवणाऱ्या या दोन अमृतयोगी घटनांद्वारे पुन्हा एकदा समाजाचे जागरण करण्यासाठी, हिंदूंच्या शौर्याचे स्मरण करण्यासाठी, राष्ट्र जागरण कार्यात हिंदू तरुणांचा सहभाग वाढविण्यासाठी, सनातन हिंदू धर्म रक्षणासाठी संपूर्ण भारत देशात विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे छत्रपती श्री शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेचे आयोजन केले आहे. त्याप्रीत्यर्थ हिंगणघाट शहरात शौर्य जागरण यात्रेचे आगमन होत आहे.
ही शौर्य यात्रा पुसद वरून यवतमाळ, वणी आणि पोहना, वडणेर मार्गे हिंगणघाट येथे 6 ऑक्टोबर 2023 ला दुपारी 4 वाजता संत तुकडोजी महाराज पुतळा येथे पोहचत आहे. इथून हिंगणघाट येथील मुख्य मार्गाने यात्रा मार्गस्थ होऊन शिवाजी महाराज पार्क येथे पोहचेल. या ठिकाणी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल हिंगणघाट प्रखंडा तर्फे सायंकाळी ६ वाजता जाहीर सभेचे आयोजन केलेले आहे. या जाहीर सभेत प्रमुख वक्ते म्हणून मयूरजी महाराज व देवेशजी मिश्रा, गोंदिया हे सभेला संबोधित करतील तसेच प्रमुख उपस्थिती अटलबिहारी पांडे यांची राहील.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व आयोजकांनी केले आहे. आयोजकामध्ये विहिंप मंत्री सचिन धारकर, सहमंत्री शरद कोणप्रतिवार, मंदिर अर्चक पुरोहित प्रमुख रवींद्र खंडाळकर, बजरंग दल सयोंजक दीपक शर्मा, नगर सयोंजक प्रशांत तिवारी, सह संयोजक मयुर बसंतांनी, धर्मा जोशी, अनिल पावडे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.

