मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- येथून संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. सून आणि साळ्याच्या पत्नीने संगमत करून आपल्याच कुटुंबातील पाच जणांची विष प्रयोग करून निर्घृण पने हत्या केली आहे. ही घटना समोर येताच संपूर्ण जिल्हासह राज्यात खळबळ उडाली आहे.
गडचिरोली जिल्हातील अहेरी तालुक्यातील महागाव येथील शंकर पिरू कुंभारे यांच्या कुटुंबातील पाच जणांचा अवघ्या 20 दिवसांच्या अवधीत अचानक आजारी पडून संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणाचे गूढ अखेर उलगडले असून कुंभारे यांची सून संघमित्रा आणि त्यांच्या साळ्याची पत्नी रोझा रामटेके या दोघींनी सनगमत करून या पाचही जणाचा नियोजनबद्ध पद्धतीने हत्या केल्याची धक्कादायक बाब तपासात उघडकीस आली आहे.
कुंभारे कुटुंबातील पाच जणांच्या संशयास्पद मृत्यूमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात भीतीचे व संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. काहींनी हा प्रकार अंधश्रेद्धेशी जोडण्याचाही प्रयत्न केला. पण पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तपास यंत्रणा कामाला लावली आणि हे गूढ उलगडण्यात अखेर पोलिसांना यश आले.
प्राप्त माहितीनुसार, 20 सप्टेंबर रोजी शंकर कुंभारे व त्यांची पत्नी विजया कुंभारे यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यांना अगोदर अहेरी, नंतर चंद्रपूर व शेवटी नागपूर येथे रुग्णालयात भरती करण्यात आले. 26 सप्टेंबरला शंकर कुंभारे व 27 सप्टेंबरला विजया यांचा मृत्यू झाला. त्या धक्क्यातून परिवार सावरत असतानाच अहेरी येथे राहणारी त्यांची मुलगी कोमल दहागावकर, मुलगा रोशन कुंभारे तसेच शंकर कुंभारे यांची मूल येथे राहणारी साळी वर्षा उराडे यांचीही प्रकृती बिघडली. त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात भरती करण्यात आले. 8 ऑक्टोबर रोजी कोमलचा, 14 ऑॅक्टोबरला वर्षाचा तर दुसऱ्या दिवशी 15 ऑक्टोबरला रोशनचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या पाच झाली होती.
मृतक शंकर कुंभारे यांचा मोठा मुलगा सागर कुंभारे हा दिल्लीत राहतो. तो आला होता. तो दिल्लीला परतल्यावर अचानक प्रकृती बिघडल्याने त्याला तेथे रुग्णालयात भरती करण्यात आले. शिवाय कुंभारे दाम्पत्याला अहेरी येथून चंद्रपूरला उपचारासाठी नेणारा कारचा चालक राकेश मडावी याचीदेखील प्रकृती बिघडली. त्याला चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. शंकर कुंभारे यांच्या साळीच्या मुलाचीही प्रकृती बिघडली व त्यालाही रुग्णालयात भरती करण्यात आले. सध्या या तीनही जणांची प्रकृती स्थिर आहे.
एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींच्या मृत्यूचे गूढ उलगडण्यासाठी पोलिसांनी चार वेगवेगळी तपास पथके गठित करून यंत्रणा सक्रिय केली. या यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीत संशयाची सुई संघमित्रा कुंभारे व रोझा रामटेके यांच्याकडे गेली. त्यांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर या प्रकरणातील धक्कादायक माहिती पुढे आली. या गुन्ह्यात इतरही व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
यासाठी केली पाच जणांची हत्या.
आरोपी संघमित्रा ही मृतक रोशन कुंभारे याची पत्नी आहे. तिने घरच्यांच्या विरोधात जाऊन डिसेंबर 2022 मध्ये लग्न केले होते. त्यामुळे संघमित्राच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. विवाहानंतर पती रोशन व सासरच्या मंडळींकडून तिचा जाच व्हायचा. म्हणूनच तिने त्यांचा काटा काढायचा ठरवले. दुसरी आरोपी रोझा रामटेके ही मृतक विजया कुंभारे वहिनी, म्हणजेच संघमित्राची मामेसासू आहे. विजया कुंभारे व तिच्या अन्य बहिणी वडिलांच्या (रोझाच्या सासऱ्यांच्या) शेतजमिनीत हिस्सा मागत होत्या. त्यावरून त्यांच्यात नेहमी वाद व्हायचा. त्यामुळे संघमित्रा व रोझा या दोघींनीही संगनमत केले व संपूर्ण कुंभारे परिवार व त्यांच्या नातलगांना विष देऊन हत्या करण्याची योजना आखली.
असा प्रकारे करण्यात आला विषप्रयोग…
आरोपी संघमित्रा व रोझा या दोघींनीही अगोदर कुंभारे कुटुंबाला संपविण्यासाठी धोतरा या विषारी वनस्पतीचा वापर करण्याचा प्रयत्न केला. पण, या वनस्पतीमुळे अन्न किंवा पाण्याचा रंग बदलत होता. त्यामुळे इंटरनेटवर शोधून त्यांनी रंग, चव, गंध मिसळल्यानंतरही न बदलणाऱ्या एका विशेष प्रकारच्या रासायनिक विषाची माहिती मिळवली. या विषाचा असर चार-पाच दिवसांनी संथ गतीने होतो. रोझाने तेलंगण राज्यातून हे विष आणले. संधी मिळेल तेव्हा या दोघींनी खाण्यापिण्यात हे विष मिसळले. कुंभारे दाम्पत्याला रुग्णालयात नेणाऱ्या वाहनचालक राकेश मडावी याला जडीबुटीचे पाणी असल्याचे सांगत एक बाटली संघमित्राने दिली होती. त्यातील पाणी प्यायल्याने राकेशचीही प्रकृती बिघडली.

