मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्हातून एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. येथील अहेरी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या रेपनपल्लीच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये काल रात्री भीषण चकमक झाली. या चकमकीत चार नक्षल्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर येत आहे.
काल रात्री भीषण चकमक पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली यात पोलिसांनी जोरदार हल्लाबोल करत चार नक्षल्यांना यमसदनी धाडले आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी सर्चिग ऑपरेशन सुरू केले असल्याचे सांगितले जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांसाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे. अहेरी उपपोलीस मुख्यालयातून सी-60 आणि सीआरपीएफ क्यूआरटीची अनेक पथक यासह अतिरिक्त एसपी ऑपरेशन यतीश देशमुख यांच्या नेतृत्वात परिसरात शोधमोहीम सुरु आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, परिसरात असलेल्या कोलामार्का जंगलात येथे आज पहाटे सर्च ऑपरेशन सुरु असताना सी-60 दलांच्या एका पथकावर नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. याला पथकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. गोळीबार थांबल्यानंतर परिसराची झडती घेतली असता 4 पुरुष नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. यावेळी गोळीबाराच्या ठिकाणाहून एक एके 47, एक कार्बाइन आणि 2 देशी बनावटीचे पिस्तूल, नक्षलवादी साहित्य आणि सामान जप्त करण्यात आले आहे.
ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये डीव्हीसीएम वर्गेश, डीव्हीसीएम मागटू, पलटन सदस्य कुरसंग राजू आणि पलटन सदस्य कुडिमेट्टा व्यंकटेश यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांसाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे.

