लातूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन लातूर:- जिल्हातील निलंगा तालुक्यातून एक मनसुन्न करणारी घटना समोर आली आहे. परिस्थिती बेताची असल्याने आपल्या मुलांना चागल्या इंग्रजी सीबीएसई शाळेत शिक्षण देता येत नसल्याच्या नैराश्यातून आईने आपल्या पोटच्या मुलीसह विहिरीत उडी मारली. त्यात मायलेकीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना माळेगाव (क.) येथे घडली.भाग्यश्री व्यंकट हालसे वय 26 वर्ष व समिक्षा व्यंकट हालसे वय 5 वर्ष असे मयत मायलेकीचे नाव आहे. ही घटना समोर येताच संपूर्ण जिल्हात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी औराद शहाजानी पोलिस ठाण्यात बुधवारी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
माळेगाव (क.) येथे राहणारे व्यंकट हालसे यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, मुलगा सार्थक व मुलगी समिक्षा आहेत. त्यांना दीड एकर शेती आहे. मात्र, ती आई- वडिलांकडे आहे. शेळ्या राखून कुटुंबाची उपजिविका करीत असल्याने हालसे यांच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. दोन्ही मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न वडील व्यंकट करीत होते. दरम्यान, आपली दोन्ही लेकरं सीबीएसई इंग्रजी शाळेत शिकावेत अशी इच्छा त्यांची पत्नी भाग्यश्री यांना होती. त्यामुळे त्या पतीकडे वारंवार चौकशी करीत मुलांना सीबीएसई शाळेत पाठवू असे म्हणत होत्या. तेव्हा पती समजूत काढून शाळेत पाठवू असे म्हणत असत. मात्र, त्यास उशीर होत असल्याने त्या नैराश्यग्रस्त झाल्या आणि मंगळवारी सायंकाळी 5.30 वाजताच्या दरम्यान घरातील मुलीला सोबत घेऊन गावाबाहेर पडल्या. त्यांनी गावाजवळील शेतकरी केदार पाटील यांची विहीर गाठली आणि पतीला फोन करुन आपल्या दीदीचं शेवटचं तोंड पहा म्हणत विहिरीत उडी घेतली.
पाण्यात बुडून मायलेकीचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी दोघींचाही मृतदेह पाण्याबाहेर काढला. बुधवारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात येऊन सायंकाळी माळेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी मयताचे वडील अरुण बोडके (रा. धनगरवाडी, ता. देवणी) यांच्या माहितीवरुन औराद शहाजानी पाेलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सपोनि विठ्ठल दुरपडे हे करीत आहेत.
मुलगा खेळण्यासाठी निसटला अन्…
भाग्यश्री हालसे ह्या नैराश्यातून मंगळवारी सायंकाळी मुलीला घेऊन विहिरीकडे जात असताना रस्त्यात मुलगा समर्थ खेळत असताना दिसला. त्यामुळे आईने त्याच्याही हाताला धरून चल माझ्यासोबत असे म्हणत घेऊन चालल्या होत्या. तेव्हा खेळण्यासाठी तो आईच्या हातून निसटून पळाला. त्यामुळे तो बचावल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

