✒️ राज शिर्के, मुंबई प्रतिनिधी
मुंबई:- उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाला शिवाजी मैदानावर मेळावा घेण्याची परवानगी दिल्यानंतर शिंदे गटाने मुंबईतील बीकेसी मैदानावर मेळावा घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे. याच निमित्ताने शिंदे गट- उद्धव ठाकरे गट यांच्यात टोकाचा संघर्ष पाहायला मिळतोय. हा मेळावा यशस्वी ठरावा यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न केले जात असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मेळाव्यासंदर्भातच आज महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन केले आहे. दरम्यान, शिंदे गटातील आमदार सुहास कांदे यांनी ही बैठक आणि दसरा मेळाव्यावर भाष्य केले आहे. शिवसैनिक बीकेसी मैदानावर मोठ्या संख्येने जमणार आहेत. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याच आमची भूमिका आहे, असे सुहास कांदे यांनी सांगितले.
दसरा मेळाव्यासाठी नाशिक शहर आणि जिल्ह्यातून ३५० ते ४०० गाड्या जाणार आहेत. माझ्या मनमाड मतदारसंघातून आम्ही दोन रेल्वे आरक्षित केल्या आहेत. दोन रेल्वेंमधून शिवसैनिक मुंबईला मेळाव्यासाठी जाणार आहेत. याआधीही एकनाथ शिंदे यांनीच दसरा मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. त्यामुळे आतापर्यंत शिवाजी मैदानासाठी जी तयारी केली जात होती, अगदी तीच तयारी आता बीकेसी मैदानावर होत आहे. त्यामुळे आम्हाला हे काही नवे नाही, असे सुहास कांदे म्हणाले.
न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. मात्र उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. या निकालाची छायांकित प्रत आम्हाला सोमवारी मिळणार आहे. त्यानंतर आम्ही ज्येष्ठ विधितज्ज्ञांशी चर्चा करू. सर्वोच्च न्यायालयात जायचे की नाही, यावर एकनाथ शिंदे हेच निर्णय घेतील. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराच्या शिवसेनेची मानसिकता ही सर्वोच्च न्यायालयात जाण्याची आहे, अशी माहिती सुहास कांदे यांनी दिली.
बीकेसीचं मैदान शिवाजी पार्कपेक्षा खूप मोठं आहे. आतापर्यंत आम्ही शिवसैनिक शिवतीर्थावर मोठ्या संख्येने जमा होत होतो. त्यामुळे बीकेसीचं मैदान भरवण्यासाठी आम्हाला काही मेहनत घ्यावी लागणार नाही. बाळासाहेब ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्या विचाराचे शिवसैनिक बीकेसी मैदानावर मोठ्या संख्येने जमतील, असा विश्वास सुहास कांदे यांनी व्यक्त केला.

