शेतक-यानी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे- पालकमंत्री भोयर, बारामती कृषि विज्ञान केंद्र व जैन इरिगेशन ला देणार भेट.
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा. दि16:- शेतकरी अभ्यास दौ-यातून शेतक-यांनी नव नववीन तंत्रज्ञान आत्मसात करुन पारंपारिक शेती बरोबरच आधुनिक पध्दतीची शेती कशी करता येईल याचा अभ्यास करावा. पारंपारिक शेती पद्धतीमुळे उत्पादन कमी होत असल्याने आधुनिक शेतीचा पध्दतीचा अवलंब करावा, अशा शुभेच्छा देऊन राज्याचे गृह (ग्रामिण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनीकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी शेतकरी अभ्यास दौरा बस ला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या प्रयत्नातून नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाच्यावतीने आधुनिक तंत्रज्ञान आधारित प्रशिक्षण व प्रक्षेत्र भेट कृषि विज्ञान केंद्र बारामती व जैन इरिगेशन जळगाव येथे अभ्यास दौ-याचे आयोजन करण्यात आले. या अभ्यास दौरा बसला पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी वान्मथी सी., जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, कृषि अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर पुढे म्हणाले की, जिल्ह्यात प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, हरभरा व गहू या सारखी पारंपारिक पिके घेण्यात येते. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी फळबाग, भाजीपाला सोबतच शेतीला जोड धंदा म्हणून दुग्ध उत्पादन, कुक्कुटपालन, मत्स्य पालन, शेळी पालन व अन्य व्यवसाय करतात. विदर्भात व जिल्हयात सर्व सोयी उपलब्ध असताना देखील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करीत नाही. ही माहिती त्यांना व्हावी व त्यांचे जीवनमान उंचावावे यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौ-यातून शेतक-यांना मोठी माहिती मिळणार आहे. त्यामुळे याचा फायदा त्यांना होणार असून शेतक-यांनी आधुनिक पद्धतीच्या शेतीची व जोड व्यवसायाची कास धरावी, असे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यात एकूण शेतीच्या फळबाग क्षेत्र फारच नगण्य आहे. हे क्षेत्र वाढविण्यास देखील यामुळे मदत मदत होईल असे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले. जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी अत्यंत अल्प वेळात पालकमंत्री भोयर यांच्या सुचनेनुसार हा दौरा आयोजित करण्यात आल्याची माहिती देत शेतक-यांनी या दौ-यातून नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे, असे आवाहन केले.
जिल्ह्यातील 264 शेतक-यांच समावेश
अभ्यास दौ-याकरीता जिल्ह्यातील 264 शेतकरी सहभागी झाले आहे. यामध्ये वर्धा तालुक्यातील 45 व सेलू तालुक्यातील 45, देवळी 45, आर्वी 39, आष्टी 23, कारंजा 22, हिंगणघाट 22 व समुदपूर 23 अशा जिल्ह्यातील एकुण 264 शेतक-यांचा सहभाग आहे. वर्धा व सेलू येथील शेतक-यांच्या दोन बस वर्धा येथील जिल्हा अधीक्षक कृषि कार्यालयातून रवाना करण्यात आल्या तर इतर तालुक्याच्या सबंधीत कृषि कार्यालयातून अशा एकुण 6 बस रवाना करण्यात आल्या. सोबतच कृषि कार्यालयाचे एकुण 13 अधिकारी व कर्मचारी अभ्यास दौ-यात सोबत रवाना करण्यात आले आहे.
सेलूत होणार कृषि भवन, 2 कोटी 37 लक्षचा निधी मंजूर- डॉ पंकज भोयर, पालकमंत्री
सेलू येथील तालुका कृषि अधिकारी कार्यालय किराया च्या इमारती मध्ये होते. त्यामुळे अनेक अडचणी येत होत्या. कृषि विभागा अंतर्गत शेतकरी बांधव यांच्यासाठी अनेक योजना राबविण्यात येतात. तथापि, नेहमी कार्यालयात शेतक-यांची गर्दी असते. कार्यालय ची स्वतंत्र इमारत असावी यासाठी प्रयत्न करण्यात आले. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 2 कोटी 37 लक्ष रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.लवकरच इमारत बांधकामास सुरुवात होईल.

