प्रशिक सुरेंद्र वाळके, गडचांदुर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचांदूर:- नगर परिषदेच्या हद्दीत येणाऱ्या डोहे ले-आऊट मधील नागरिकांना आजही मूलभूत सुविधा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. या परिसरात ना नळाची लाइन आहे ना सरकारी बोरिंगची सुविधा, त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी दररोज लांब अंतर प्रवास करावा लागत आहे.
स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे वेळोवेळी निवेदने देऊनही कुठलीही ठोस कार्यवाही झाली नाही, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. उन्हाळ्याचे तीव्र चटके आणि पाण्याची वाढती टंचाई लक्षात घेता डोहे ले-आऊटमधील समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.
“आम्ही वारंवार नगर परिषदेचे उंबरठे झिजवले, पण केवळ आश्वासनांपलीकडे काहीच मिळालं नाही,” अशी भावना येथील नागरिक व्यक्त करत आहेत. महिलांना आणि वृद्धांना पाण्यासाठी घरोघरी जावे लागते, तर लहान मुलांचे शिक्षणही या समस्येमुळे अडथळ्यांत सापडले आहे.
लोकप्रतिनिधींनी आणि नगर परिषद प्रशासनाने या भागाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने नळाची पाण्याची लाईन टाकणे व सरकारी बोरिंगची सुविधा उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
पाणी हा मूलभूत हक्क आहे, आणि तो प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. डोहे ले-आऊटमधील नागरिक आता या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यास सज्ज झाले असून, लवकरात लवकर योग्य पावले उचलली नाहीत, तर जनआंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

