✒️मंगेश जगताप, मुंबई प्रतिनिधी
मुंबई/पालघर:- संपूर्ण देश भर आज विजयादशमी उत्साहात साजरी करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी रावणाचे दहन करुन आनंद महोत्सव साजरा करण्यात येत असतो. पण महाराष्ट्र मुंबईपासून जवळ असलेल्या पालघर जिल्ह्यात राजा रावणाची पूजा करण्यात आली. रावणाचं दहन करण्याऐवजी त्याची पूजा का केली पाहिजे, याची कारणंही पूजा करणाऱ्यांनी सांगितलं.
दसऱ्याच्या दिवशी पालघर शहरातील शिवाजी चौक इथं राजा रावणाची संपूर्ण श्रद्धापूर्वक पूजा करण्यात आली. चौकात रावणाचा प्रतिकात्मक फोटो लावून त्याची आरती ओवाळण्यात आली. आदिवासी एकता परिषदे व भूमी सेनेच्या वतीने रावणाच्या पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं.
पालघरमध्ये आदिवासी एकता परिषद आणि भूमी सेना यांच्यावतीने राजा रावणाची पूजा करण्यात आली. रावण हे श्रद्धेचं प्रतीक असल्याचा दावा या दोन्ही संघटनांच्या वतीने करण्यात आला. रावणाचं दहन केल्यानं आपण आपल्या बुद्धिमत्तेचंही दहन करतो, असंही मत यावेळी त्यांनी व्यक्त केला.
आदिवासी एकता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष दत्ताराम करबट यांनी रावणाची पुजा का केली पाहिजे, यावर सविस्तर आपली भूमिका मांडली. रावणानं सीतेचं अपहरण केलं. पण तिचा स्त्री सन्मान राखला. सीतेला कोणत्याही प्रकारजी इजा त्याने होऊ दिलेली नाही. लंकेचा राजा असलेल्या रावणाने आपल्या तपश्चर्येनं भगवान शंकरालही प्रसन्न केलं होतं, असंही करबट यांनी म्हटलंय.
