युवराज मेश्राम प्रधान संपादक (नागपूर)
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन नागपूर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका प्रेमिकेने आपल्या प्रियकराची चाकूने वार करत निर्घुण हत्या केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मृतक प्रियकराने आपल्या प्रेमिकेकडे लग्नाचा तगादा लावला होता त्यातून ही हत्या झाल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. मृत प्रियकर बालाजी कल्याने
आपल्या प्रियकराची निर्घुण हत्या केल्या नंतर आपल्या गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून प्रेयसीने स्वतःच्या शरीरावर चाकूने वार करून हल्ल्याचा बनाव रचला. मात्र, पोलिसांच्या कसून चौकशी केल्याने प्रेमिकेनेच आपल्या प्रियकराची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. बालाजी कल्याने असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पाच वर्षांचा प्रेमसंबंधावाचा खुनी अंत: नांदेड जिल्ह्यातील नातेवाईक असलेले प्रियकर आणि प्रेयसी नागपूरमध्ये रोजगार आणि शिक्षणासाठी आले होते. यातील आरोपी प्रेमिका ही बीएएमएसच्या शेवटच्या वर्षाला होती. मृतक बालाजी हा पोलीस भरतीसाठी तयारी करत होता, दोघांचे गेल्या 5 वर्षांपासून प्रेमसंबंध होते, मात्र गेल्या काही दिवसांत प्रियकराने प्रेयसीला लग्नाचा तगादा लावला. प्रेयसीच्या वडिलांना फोन करून लग्न लवकर लावून द्या, अन्यथा माझ्या पार्थिवाच्या दर्शनासाठी तुम्हाला नागपूर यावं लागेल, अशी धमकीही दिली होती. यामुळे प्रेयसी त्याच्यावर संतापली होती.
रूममधून ओरडण्याचा आवाज पण रूम बंद: बुधवारी रात्री आरोपी प्रेमिका प्रियकराच्या रूममध्ये आली. बालाजी आणि त्याचा रूम मित्र तिघांच्या पण रात्री उशिरा पर्यंत गप्पा चालल्या. त्यानंतर बालाजी आणि आरोपी प्रेमिका रूममध्ये गेले. काही वेळानंतर रूममधून जोरात ओरडण्याचा आवाज आला. मृतकाच्या मित्राने रूमचा दरवाजा ठोठावला मात्र प्रेयसीने दरवाजा उघडला नाही. 20 मिनिटांनी जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा दोघेपण रक्तबंबाळ अवस्थेत निपचित पडून असल्याचं दिसलं. त्यानंतर मित्राने घरमालकाच्या मदतीने या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी बालाजी याला तपासून मृत घोषित केले तर जखमी प्रेमिकेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसी खाक्या आणि प्रेयसीने दिली हत्येची कबुली: या घटनेची माहिती नंदनवन पोलिसांना मिळताच पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. प्रियकराच्या अंगावर चाकूच्या खोल जखमा होत्या. दोघांमध्ये वाद झाला असावा यातून प्रियकराची हत्या झाली असावी, असा पोलिसांना संशय आला. आपलं बिंग फुटू नये म्हणून प्रेमीकेने प्रियकराने माझ्यावर हल्ला करत स्वतःवर चाकूने वार करत आत्महत्या केल्याचा बनाव केला. प्रेयसी रुग्णालयात उपचार घेत असल्याने तिच्यावर दडपण येऊ नये म्हणून पोलिसांनी सुरुवातीला तांत्रिक तपास केला. मात्र प्रियकराच्या शरीरावर असणाऱ्या खोल जखमांमुळे पोलिसांना दाट संशय प्रेयसीवर होता. अखेर पोलिसी खाक्या दाखविल्यावर प्रेयसीने हत्या केल्याची कबुली दिली.
आपल्याच प्रियकराची हत्या करणाऱ्या प्रेमीकेवर नंदनवन पोलिस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिला डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलीस ताब्यात घेतील, अशी माहिती पोलिसांनी दिली. गेली पाच वर्षे प्रेमाच्या आणाभाका घेतलेल्या प्रेमीकेने अशा प्रकारे आपल्या प्रियकराची हत्या केल्याच्या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. या प्रकरणी मयत प्रियकर बालाजी याच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये या प्रेयसीविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 302 (हत्या) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

