✒️महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी
संगमनेर:- तालुक्यातून एक खळबळजनक आणि मन हेलावणारी घटना समोर आली आहे. वीजवाहक तारेचा स्पर्श झाल्याने एकच कुटुंबातील चार चिमुकल्या बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी गावाअंतर्गत येणाऱ्या वांदरकडा येथे आज समोर आली आहे. या घटनेमुळे बर्डे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सदर वीजवाहक तार गेल्या चार दिवसांपासून तुटली होती. मात्र वीज महावितरण याकडे वेळीच लक्ष न दिल्याने ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
वीज वितरण महामंडळाच्या हलगर्जीमुळे मोलमजुरी करुन पोट भरणाऱ्या बर्डे कुटुंबीय दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्राप्त माहितीनुसार, अजित बर्डे आणि अरुण बर्डे हे दोघे भाऊ आपल्या परिवारासह वांदरकडा येथे वास्तव्यात आहेत. बर्डे कुटुंबीय मोलमजुरी करुन आपले उदरनिर्वाह चावलतात. दोन्ही अजित बर्डे यांना 8 वर्षाचा आणि 6 वर्षाचा असे दोन मुलगे होते, तर अरुण बर्डे यांना 12 वर्षे आणि 10 वर्षाचे दोन मुले होती.
शनिवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर ही चारही मुलं घराजवळ खेळत होती. जवळच असलेल्या नाल्याजवळ मुले खेळत होती. खेळता असतानाच नाल्याजवळ असलेल्या वीजवाहक तारेचा मुलांना धक्का लागला आणि तारही मुले जागीच ठार झाली. यावेळी तेथेच आसपास शेळ्या चारत असलेली मुलांची आजी अलकाबाई बर्डे हिच्या ही बाब लक्षात आली. यानंतर अलकाबाईने जोरजोरात आरडाओरडा केला. अलकाबाईचा आरडाओरडा ऐकून आसपासच्या लोकांनी धाव घेतली.
याबाबत घारगाव पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर चारही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील तालुका कुटीर रुग्णालयात पाठवले.
महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे चार बालकांचा नाहक बळी
गेल्या चार दिवसांपासून ही वीजवाहक तुटली आहे. मात्र महावितरणने याकडे लक्ष दिले नाही. यामुळेच ही दुर्घटना घडली आणि चार निष्पाप बालकांचा बळी गेल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. घटनेची माहिती कळताच स्थानिक नेते, वायरमन, पोलिसांनी घटनस्थळी धाव घेत पाहणी केली.