मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
वन वैभव शिक्षण मंडळ, अहेरी द्वारा संचालित नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय, मुलचेरा येथे आज दिनांक 30 जानेवारी 2026, शुक्रवार रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त हुतात्मा दिन अत्यंत श्रद्धा व आदरभावाने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंजित मंडल यांनी भूषविले. प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. रंजित मंडल यांनी महात्मा गांधीजींच्या सत्य, अहिंसा, त्याग व राष्ट्रसेवेच्या विचारांचे महत्त्व विशद केले. गांधीजींचे विचार आजच्या सामाजिक व शैक्षणिक जीवनात मार्गदर्शक ठरतात, असे त्यांनी नमूद केले.
त्यानंतर भारतीय स्वातंत्र्यलढ्यात देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ दोन मिनिटांचे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यामुळे संपूर्ण महाविद्यालय परिसरात भावपूर्ण व शिस्तबद्ध वातावरण निर्माण झाले होते.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी महात्मा गांधी यांच्या विचारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शांतता, अहिंसा व राष्ट्रीय एकतेच्या संदेशाने करण्यात आला.

