मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
अहेरी येथील भगवंतराव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला निरोप समारंभ उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडला. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी विशेष तयारी केली होती. सभागृहाची आकर्षक सजावट, शिस्तबद्ध आयोजन आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे समारंभाची शोभा अधिकच वाढली.
या निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधिकारी डॉ. लुबना हकीम विराजमान होत्या. कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य लोनबले सर प्रमुख उपस्थित म्हणून लाभले, तर महाविद्यालयाचे प्राचार्य शहीद शेख सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी वरिष्ठ लिपिक मुक्तीदिर शेख व साकीर शेख हेही मान्यवर म्हणून उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात डॉ. लुबना हकीम यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. शिक्षण हे केवळ परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नसून व्यक्तिमत्त्व घडविण्याचे प्रभावी साधन आहे, असे त्यांनी सांगितले. जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रामाणिकपणा, सातत्य, परिश्रम व आत्मविश्वास या गुणांची नितांत आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. अपयशाने खचून न जाता त्यातून धडे घेत पुढे वाटचाल करावी, असे प्रेरणादायी विचार त्यांनी व्यक्त केले.
प्राचार्य लोनबले सर यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या शालेय व महाविद्यालयीन जीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थ्यांनी शिस्त, परिश्रम व गुरुजनांप्रती आदर ही मूल्ये आयुष्यभर जपावीत, असे सांगत त्यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
प्रमुख पाहुणे प्राचार्य शहीद शेख सर यांनी स्पर्धात्मक युगात यश संपादन करण्यासाठी स्पष्ट ध्येय, कौशल्यविकास व सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. महाविद्यालयात मिळालेले ज्ञान, अनुभव व संस्कार समाजहितासाठी उपयोगात आणावेत, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
याप्रसंगी अकरावीच्या विद्यार्थ्यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांविषयी आपुलकी व कृतज्ञता व्यक्त करत भावनिक मनोगत सादर केले. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणी, अनुभव व शुभेच्छा व्यक्त केल्यामुळे वातावरण भावूक झाले. तसेच नृत्य, गीत, अभिनय आदी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी समारंभात रंगत आणली.
कार्यक्रमाच्या शेवटी बारावीच्या विद्यार्थ्यांनीही आपल्या भावना व्यक्त करत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व कनिष्ठ विद्यार्थ्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन अकरावीची विद्यार्थिनी कु. स्वरूपा आकूदारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन कु. स्तुती कोल्हे यांनी केले. हा निरोप समारंभ सर्वांच्या सहकार्याने अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.

