✒️ राज शिर्के, मुंबई प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. यासाठी भाजप आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेने आपले उमेदवार निश्चित करत अर्ज देखील भरले आहेत. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. हि निवडणूक बिनविरोध व्हावी, असं अवाहन देखील केलं आहे. राज ठाकरेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील ही निवडणुक बिनविरोध व्हावी असे अवाहन केले आहे.
यानंतर आता एक मोठी माहिती समोर आली आहे. अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक हि बिनविरोध होणार अशी चर्चा सुरु झाली आहेत. त्यातच शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीत हि निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी केली आहे. सरनाईक यांच्या पत्रानंतर आता चर्चांना मोठ्या प्रमाणात उधाण आलं आहे. तसेच भाजप काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महाराष्ट्राचा आजपर्यतचा इतिहास पहिला तर लक्षात येत कि, एखाद्या आमदार किंवा खासदाराचे निधन झालं कि पोटनिवडणुकीणूत त्यांच्या घरातील सदस्य निवडणुकीला उभा असेल तर विरोधी पक्षांनी त्यांच्याविरोधात उमेदवार द्यायचा नाही. ती जागा बिनविरोध द्यायची. पण सध्याचं राज्यातील राजकारण पाहता शिवसेना ( ठाकरे गट ) आणि भाजप मागे हटायला तयार नाहीत. याआधी शरद पवार यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर तर राज ठाकरे यांनी रमेश वांजळे यांच्या निधनानंतर उमेदवारी दिली नव्हती.
मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या निवडणूका लक्षात घेता पंढरपूरमध्ये दिवंगत भारत भालके यांच्या निधनानंतर भाजपने आपला उमेदवार देत निवडणूक जिंकली होती. तर दुसरीकडे कोल्हापूरमध्ये दिवंगत चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर देखील भाजपने उमेदवार देत निवडणूक लढवली होती. मात्र यावेळी त्यांचा पराभव झाला होता. यानंतर आता अंधेरी विधानसभा पोटनिवडणूकित भाजप काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.
या सर्व घडामोडींवर बोलताना शरद पवार यांनी देखील ही निवडणुक बिनविरोध व्हावी असे अवाहन केले आहे. उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विरोधात इतर पक्षांनी उमेदवार देऊ नये अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली आहे. ऋतुजा लटके यांच्या विरोधातील अर्ज मागे घ्यावा. अजूनही उमेदवार मागे घेण्यासाठी वेळ असल्याचेही शरद पवार म्हणाले. महाराष्ट्रात योग्य संदेश जाण्यासाठी ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून द्यावे अशी माझी इच्छा आहे. दीड वर्षांच्या कालावधीसाठी राजकारण नको असेही शरद पवार म्हणाले.
अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीतून आपला उमेदवार मागे घ्यावा, भाजपनं निवडणूक लढवू नये, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. आमदार रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट-निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नम्र आवाहन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धोरणात्मक भूमिका असं म्हणत राज ठाकरेंनी ट्वीट केलं आहे. एखाद्या नेत्याचं निधन झाल्यावर त्याच्या घरातील व्यक्तीला उमेदवारी दिल्यास पोटनिवडणूक बिनविरोध होते. हा इतिहास आहे, असंही या पत्रात नमूद केलं आहे.

