मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक/ दिंडोरी:- तालुक्यातील शिवार पाडा येथे एकाच कुटुंबातील सात सदस्यांना जेवणातून विषबाधा झाली असल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या सर्वांवर ननाशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार चालू आहेत.
पश्चिम आदिवासी भागात असलेल्या शिवार पाडा येथे राऊत कुटुंबीयांनी दुपारी जेवण केल्यानंतर सातही व्यक्तींना जुलाब, उलट्या, पोटदुखी असा त्रास चालु झाला. त्यानंतर त्यांना ननाशी आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. त्यांच्यावर डॉ. प्रशांत जोशी व इतरांनी उपचार केले. सध्या सुनील देवराम राऊत, विठ्ठल राऊत, राधा राऊत, नंदा राऊत, काशीनाथ राऊत, चंद्रकला राऊत या सहा ही जणांवर उपचार चालू आहेत. त्यांच्या रक्ताचे नमुने देखील घेण्यात आले आहे. अन्नपदार्थाचे देखील नमुने घेण्यात आले असून, प्रयोगशाळेत तपासणीसाठी ते पाठवण्यात आले आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी ननाशी आरोग्य केंद्रास भेट देऊन रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. दिंडोरीचे नगरसेवक नितीन गांगुर्डे यांनी ननाशी प्राथमिक आरोग्य केंद्रातील उपचारांची माहिती घेतली. या घटनेनंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.