महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी
संगमनेर:- तालुक्यातील काही ग्रामपंचायतीमध्ये गैरकारभार झाल्याचे आढळले आहे. मात्र, कारवाई करण्याऐवजी पंचायत समिती कार्यालयातून ग्रामसेवक, सरपंच व सदस्यांची पाठराखण होत आहे, असा दावा करीत भाजपा संगमनेर तालुकाध्यक्ष सतीशराव कानवडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकारी व कार्यक र्त्यांनी पंचायत समिती कार्यालयामध्ये गटविकास अधिकारी अनिल नागणे यांना निवेदन देत जाब विचारत चांगलेच धारेवर धरले.
गेल्या पाच वर्षांपासून तालुक्यात अनेक ग्राम पंचायत कार्यालयात गैरकारभार चालत आहे. खोटे ठराव तयार करून पदाचा गैरवापर केला आहे. अशा अनेक तक्रारी करुन देखील पंचायत समितीने या गंभीर बाबीची कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही. यामुळे अनेक गावांतील जनतेमध्ये तीव्र स्वरुपाचा असंतोष निर्माण झाला आहे. यामुळे गट विकास अधिकारी अनिल नागणे यांनी या गंभीर बाबीची दखल घेऊन चौकशी सुरू करावी.
संबंधितांवर सात दिवसामध्ये कठोर कारवाई करावी, अन्यथा गावांमधील ग्रामस्थांसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते पंचायत समिती कार्यालयाच्या समोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहेत, असा इशारा भाजप तालुकाध्यक्ष सतीशराव कानवडे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. अशोकराव इथापे, बाळासाहेब खेमनर, बुवाजी खेमनर, विकास गुळवे, माधवराव थोरात, बाबासाहेब कुटे, अमित नवले, शिवाजी आहेर, लहानू नवले, दीपक वाळे, गणेश पावसे, विनायक दाभोलकर, श्रीकांत गोमासे आदींनी दिला आहे.
चौकशीत दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल.
संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये गैरव्यवहार होत असल्याची तक्रार संगमनेर तालुका भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे. त्या ग्रामपंचायतीची सखोल चौकशी केली जाईल. चौकशीत कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करु. कोणालाही सोडले जाणार नाही, असे गट विकास अधिकारी अनिल नागणे म्हणाले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348