सौ.हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
बल्लारपूर:- जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत दिनांक: 28 नोव्हेंबर रोजी महात्मा ज्योतिराव फुले व कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांना एका संयुक्त कार्यक्रमाद्वारे स्मृतिदिना निमित्त आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष बी. बी. भगत सर (मुख्याध्यापक), प्रमुख पाहुणे एम. डी. टोंगे सर (माजी मुख्याध्यापक) व प्रमुख उपस्थिती एस. एम. चव्हाण सर यांची होती.
प्रथमता: समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले व महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या फोटोला मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.
आपल्या भाषणात प्रमुख पाहुणे एम. डी. टोंगे माजी मुख्याध्यापक यांनी सांगितले की, महिला दलित आणि शेतकरी वर्गासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य अत्यंत मोलाचे आहे तसेच महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार यांनी सुद्धा महाराष्ट्राच्या जडणघडणीत अमूल्य योगदान दिले आहे.
श्री. एस. एम. चव्हाण सर यांनी सांगितले की, महात्मा ज्योतिराव फुले यांनी न डगमगता समाजकार्य सुरू ठेवून समाजाला एक दिशा दिली आहे तसेच महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांनी सुद्धा महाराष्ट्राला पुढे नेण्याचे कार्य केलेले आहे. आपले अध्यक्षीय भाषण करताना बी. बी. भगत सर मुख्याध्यापक यांनी सांगितले की, मनुष्य विचारांनी जीवंत असतो. त्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे होते. राष्ट्राला महात्मा ज्योतिराव फुले यांनी दिशा प्रदान केली, म्हणूनच ते देशाचा आदर्श आहे.
महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार यांचा जन्म सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्यापाशी जिज्ञासा वृत्ती असल्यामुळे ते मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचू शकले आणि महाराष्ट्राच्या विकासात त्यांचा अत्यंत मोलाचा वाटा आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. के. वानखेडे, संचालन सौ. एस. एन. लोधे मॅडम आणि आभार प्रदर्शन एस. एम. चव्हाण सर यांनी केले. या कार्यक्रमात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी दिनेश भाले बाबू, जगदीश कांबळे, वामन बोबडे, वाल्मीक खोंडे, सुरेश मोरे, इंद्रभान अडबाले तसेच विद्यार्थी वर्गाची उपस्थिती होती.