मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन नाशिक:- महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटला असताना आता महाराष्ट्र गुजरात वाद पेटण्याची चिन्हं दिसत आहे. नाशिकमधील काही गावातील गावकऱ्यांनी त्यांचे गाव गुजरातमध्ये विलीनीकरण करण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे आता पुन्हा नवा वाद पेटण्याची चिन्हं आहेत.
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील महाराष्ट्र- गुजरात सीमेवरील तब्बल 55 गावांनी आपली गावं गुजरातमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. गुजरातमध्ये सामील होण्यासाठी या गावकऱ्यांनी थेट गुजरात गाठत गुजरातमधील वासदाच्या तहसीलदारांना यासंदर्भात निवेदन देऊन मागणी केली आहे.
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही सुरगाणा तालुक्या तील सीमावर्ती भागात ना दळणवळणासाठी रस्ते पोहचलेत, ना वीज, ना पाणी, ना आरोग्य सेवा.
शिक्षणाची सुविधा नाही, मोबाईल नेटवर्क नाही, अशा अनेक सुविधांपासून सुरगाणा तालुक्यातील आदिवासी गावकरी वंचित आहेत. तर २ किलो मीटर अंतरावर गुजरात राज्यातील गावांमध्ये मात्र रस्ते, वीज, शिक्षण, आरोग्य अशा सर्व सोयी सुविधा मिळत असल्यानं या गावकऱ्यांनी आपली गावं गुजरातमध्ये समाविष्ट करण्याची भूमिका घेतली आहे.
त्यासाठी गुजरात विलीनीकरण संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली असून लवकरात लवकर आमची गावं गुजरातमध्ये विलीन करण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर दुसरीकडे गावकऱ्यांचा आक्रमक पवित्रा बघता नाशिकचे जिल्हाधिकारीही थेट सुरगाण्यात पोहचले असून ते इथल्या आदिवासी गावकऱ्यांशी संवाद साधत आहेत. जिल्हाधिकारी यांनी गावकऱ्यांसोबत पायाभूत सोयी सुविधा आणि विकासकामांबाबत चर्चा करत आहेत. मात्र गावकरी गुजरातमध्ये विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्यानं या प्रश्नावर तोडगा काढण्यात महाराष्ट्र सरकारला यश येतं का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

