✒️राज शिर्के, (मुंबई) पवई प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या परिवाराच्या संपत्तीची चौकशी व्हावी, अशी मागणी करणारी याचिका काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरची काल सुनावणी पार पडली आहे.
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि परिवाराने बेहिशोबी मालमत्ता जमवली असल्याचा आरोप करत गौरी भिडे यांनी आणि त्यांच्या वडिलांनी ही याचिका दाखल केली होती. याबाबतची सुनावणी काल न्यायालयात पार पडली आहे. गौरी भिडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना याबाबत पत्र लिहून तक्रार केली होती. त्याचीच दखल घेत प्राथमिक चौकशी सुरू असल्याची सरकारी वकिलांची हायकोर्टात माहिती दिली आहे.
उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्तेची प्राथमिक चौकशी मुंबई पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे. पीओडब्लु याबाबत चौकशी करत आहे. गौरी भिडे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहून तक्रात केली आहे. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांची संपत्तीची चौकशी व्हावी अशी मागणी या पत्रातून करण्यात आली होती. याबाबत रीतसर चौकशीची मागणी करणारे पत्र आमच्याकडे आले आणि आम्ही प्राथमिक चौकशी सुरू केली असल्याची माहिती राज्य सरकारने हायकोर्टात दिली आहे. हायकोर्टाने याची नोंद घेतली आहे.
गौरी भिडेंच्या दाव्यावर हायकोर्टात सुनावणी.
गौरी भिडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीसाठी घ्यायची की नाही यासंदर्भातला निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. त्याचबरोबर ठाकरे यांनी या याचिकेवर आक्षेप घेतला आहे. तर ही याचिका राजकीय वैमनस्यातून दाखल केली असल्याचा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तर यासंबधी न्यायालय काय भूमिका देतं याकडे सर्वांचं लक्ष्य असणार आहे. परंतु मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने ठाकरे कुटुंबाच्या संपत्तीची चौकशी सुरू केली आहे.
दरम्यान प्रबोधन प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड आणि उद्धव ठाकरे यांच्या उत्पन्नाचे नेमकं स्त्रोत काय? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असताना कोरोना काळात सामना वृत्तपत्राचा टर्नओव्हर 42 कोटी रुपये होता, तर साडे अकरा कोटी रुपये नफा कसा झाला? ठाकरे कुटुंबाच्या उत्पन्नाच्या स्त्रोताची चौकशी व्हावी, अशी मागणी गौरी भिडे या याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात केली होती.