श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
बीड:- जिल्हातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. माजलगाव धरणात रविवारी पोहण्यासाठी गेलेले डाॅ. दत्तात्रय फपाळ यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली होती. रविवारी दिवसभर त्यांच्या मृतदेहाचा शोध घेण्यात अपयश आले. दरम्यान आज एनडीआरएफने शोध मोहीम हाती घेतली मात्र दोन जवान बेपत्ता झाले. त्यातील एका जवानास तात्काळ शोधून बाहेर काढण्यात यश मिळाले, मात्र दुसरा जवान बराच वेळ पाण्यात अडकून राहिल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
माजलगाव धरणात बुडून मृत्यू झालेल्या डॉ. फपाळ यांचा मृतदेह काढण्यासाठी परळी येथील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत. त्यांना मदत करण्यासाठी कोल्हापुर येथील एनडीआरएफचे पथक आले होते. या टिमचे शोध कार्य सुरु असताना यातील जवान राजू मोरे व शुभम काटकर हे पाण्यात अडकले होते. यातील जवान शुभम काटकर यांना तात्काळ बाहेर काढण्यात यश आले त्यांच्यावर माजलगाव येथील देशपांडे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. परंतू यातील जवान राजू मोरे यांना मात्र बाहेर काढण्यात अपयश आले. राजू मोरे हा 30 वर्षीय जवान मच्छीमारांनी लावलेल्या जाळ्यात अडकून पडला होता. त्यास गळ लावून वर काढत असतांना त्यांच्या तोंडाचा ऑक्सीजन मास्क निघून गेला. दरम्यान त्यांना पाण्यातून बाहेर काढल्यानंतर तेथे हजर असलेल्या बचाव पथकाने त्यांना मृत घोषित केले त्यानंतर या जवानास ग्रामिण रुग्णालयात नेले असता तेथील डाॅक्टरांनीही तपासणी करून मृत घोषित केले. घटनास्थळी जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा उपविभागीय अधिकारी निलम बाफना, तहसीलदार वर्षा मनाळे, मुख्याधिकारी विशाल भोसले, माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी उपस्थित आहेत. घटनास्थळी परिसरातील नागरीकांनी मोठी गर्दी केली आहे.

