महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नवी दिल्ली:- येते संसदेचे अधिवेशन सुरू आहे. त्यात मंगळवारी भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूबाबत मोठा दावा केला आहे. त्यांनी राष्ट्रपती यांच्या अभिभाषणावर बोलताना काँग्रेसवर निशाणा साधताना अनिल बोंडे यांनी हा दावा केला आहे. त्यांनी यावेळी डमी बापू, लिब्रांडू असे शब्द वापरल्याने राज्यसभेत मोठा वादही निर्माण झाला.
भाजपा खासदार अनिल बोंडे यांनी राज्यसभेत 17 मिनिटे भाषण केले. यावेळी अनिल बोंडे यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना मोदींच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. यावेळी भाषणात त्यांनी महाराष्ट्र राज्यातील विकासासह दिल्लीतील असुविधांचा उल्लेख करून त्यावरून आम आदमी पक्षावर निशाणा साधला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूबाबतही मोठा दावा केला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवडणुकीविषयीच्या धनंजय कीर यांच्या लेखनाचा संदर्भ देताना अनिल बोंडे म्हणाले की, पंतपधानपदी नेहरू असताना निवडणूक आयोगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 78 हजार मते अवैध ठरवली होती. नेहरू दोनदा डॉ. आंबेडकर यांच्या विरोधात प्रचारासाठी गेले होते. त्यावेळी जयप्रकाश नारायण यांनीही संशय व्यक्त केला होता. डॉ. आंबेडकर यांना केवळ प्रचार करून हरवले नाही तर 78 हजार मते अवैध ठरवून हरवण्यात आले.
एकदा पराभव झाल्यानंतर आंबेडकर आजारी पडले होते, त्यांना डायबिटीज सुरू झाला. भंडाराच्या पोटनिवडणुकीतही काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केला. तिथेही पंतप्रधान नेहरू प्रचाराला गेले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दत्तोपंत ठेंगडे यांनी आंबेडकरांचा प्रचार केला होता. 1954 मध्ये पराभवाचा मोठा धक्का आंबेडकरांना बसला होता. हा धक्का बसल्यानंतर 1956 मध्ये डॉ. आंबेडकर हे जग सोडून गेले. ते दोन पराभव त्यांच्या मृत्यूला जबाबदार होते, असे अनिल बोंडे म्हणाले.
डॉ. आंबेडकरांच्या मृत्यूलाही हे दोन पराभव जे काँग्रेसने जाणीवपूर्वक केले होते, तेच जबाबदार होते. महाराष्ट्रात जे बोलले जात होते तेच मी सांगत आहे, असा मोठा दावा अनिल बोंडे यांनी यावेळी केला. यावेळी भाषणात अनिल बोंडे यांनी विरोधकांवर टीका करताना लिब्रांडू या शब्दाचा वापर केल्याने राज्यसभेत काहीकाळ गोंधळ निर्माण झाला. गोपालदास नीरज यांचा संदर्भ देत बोंडे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. 2014 मध्ये पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्यानंतर खूपसारे लिब्रांडू… असे बोंडे म्हणताच विरोधी बाकांवरील सदस्य त्याविरोधात आक्रमक झाले होते.
वाद होताच अनिल बोंडे यांनी लिब्ररल हा शब्द वापरला. उपसभापतींनी विरोधी सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण गोंधळातच अनिल बोंडे यांनी पुढे आपले भाषण सुरू ठेवले. पुरस्कार वापसीवरून बोंडे यांनी विरोधकांवर टीका केली. त्यानंतर काही वेळात तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांनी अनिल बोंडे यांनी उच्चारलेल्या त्या शब्दावर आक्षेप घेतला. तो शब्द सभागृहाचा अपमान करणारा असल्याचे गोखले म्हणाले. अशा शब्दांचा सभागृहात वापर व्हायला नको, अशी नाराजीही गोखले यांनी व्यक्त केली. त्यावर उपसभापतींनी रेकॉर्ड तपासून तो शब्द असंसदीय असेल तर कामकाजातून वगळण्यात येईल, असे स्पष्ट केले.

