🖊️ महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी
संगमनेर:- ‘स्वच्छ व सुंदर संगमनेर, हरित संगमनेर’ ही महत्त्वाकांक्षी योजना शहरात राबविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे आणि त्यांच्या सहकाऱयांचा आटापिटा चाललेला आहे. मात्र, शहरासह शहरालगतच्या ग्रामीण भागात ठिकठिकाणी कचऱयाचे मोठमोठे ढीग पडलेले असून, त्या ठिकाणी दुर्गंधी सुटलेली आहे. अनेक दिवसांपासून हा कचरा उचलला जात नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
संगमनेर नगरपालिकेच्या वतीने ‘स्वच्छ व सुंदर संगमनेर हरित संगमनेर’ तसेच ‘पर्यावरणपूरक वृक्ष लागवड’ अशा अनेक योजना राबवल्या जात आहेत. मात्र, हे सर्व होत असताना संगमनेर शहरात ठिकठिकाणी कचऱयाचे ढीग पडलेले दिसून येत असल्याने ही स्वच्छता नेमकी कोण करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आता हा कचरा रस्त्यावर येण्यास सुरुवात झाली आहे.
गुंजाळवाडीकडे जाणाऱया रस्त्यावर मेडिकव्हर हॉस्पिटलच्या पुढे सावित्रीबाई फुलेनगर कॉलनीजवळ गंगासृष्टी रोडला कचऱयाचा ढीग पडलेला असून, यात कचऱयाची दिवसेंदिवस भर पडत आहे. कचऱयाचे ढीग असेच राहिल्यास नागरिकांच्या आरोग्यास त्याचा धोका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. शिवाय एका मोठय़ा हॉस्पिटलशेजारीच कचरा पडत असल्याने याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे ज्या जागेवर हा दुर्गंधीयुक्त कचरा टाकला जात आहे तिथे एक फलक लिहिण्यात आलेला असून, या ठिकाणी कचरा, दुर्गंधीयुक्त कचरा, खाद्यपदार्थ, हॉटेलचे उरलेले अन्न टाकू नये, असे स्पष्टपणे लिहिलेले असतानाही या ठिकाणी कचरा टाकण्यात येत आहे.
संगमनेर शहरालगतच्या ग्रामीण भागात कचरा संकलन करून तो डम्पिंग करण्यासाठी आणि कचरा साठविण्यासाठी संगमनेर तालुक्यात चार ठिकाणी जागा पाहिल्या असून, लवकरच त्यातील एखादी जागा निवडून कचरा डम्पिंग करण्यात येणार आहे. कचऱयापासून खत निर्मितीसुद्धा करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात कचरा साठवण्याच्या अडचणी होतात. अनेक नागरिकांचा कचरा डम्पिंगसाठी विरोध असतो. या सर्वातून लवकरच मार्ग काढून हा प्रश्न मार्गी लावावा लागणार आहे. नवनाथ अरगडे, माजी उपसभापती, पंचायत समिती, संगमनेर