🖊️आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
हिंगणघाट:- देशासाठी बलिदान करणारे विर सैनिकांमुळे आज भारत देश सुरक्षित आहे. उन्ह, वार, पाऊस झेलून आपले सैनिक चोहोभोवतालच्या सीमा सुरक्षित करतात. त्यामुळे देशातील प्रत्येक भारतीय नागरिकांनी आदर व सन्मान केला पाहिजे.
असाच सन्मान समारोह हिंगणघाट शहरात आयोजित करुन एका सैनिकांनी देशासाठी बजावलेल्या कर्तव्याला सलाम करण्यात आला. सीमा सुरक्षा दलात 22 वर्षे देश सेवा देऊन निवृत्त होऊन आपल्या जन्मगावी हिंगणघाट येथे येणाऱ्या श्रीकांत रामाजी फलके या वीर जवानाचे आज दि.४ आक्टोंबरला कारंजा चौक येथे स्वागत सोहळ्याचे आयोजन प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आले.
आज सकाळी वीर जवान श्रीकांत रामाजी फलके यांचे रेल्वेने हिंगणघाट शहरात आगमन झाल्या नंतर येथील कारंजा चौकातील अमर ज्योतीला त्यांचे हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. राष्ट्रगीत गाऊन सलामी देण्यात आली. त्यानंतर निवृत्त जवान श्रीकांत फलके यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन प्रहारचे रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे यांनी त्यांचा जाहीर सत्कार केला. यावेळी गजू कुबडे यांनी त्यांच्या देशसेवेचा गौरव केला.
या कार्यक्रमाचे आयोजक सूरज कुबडे यांनी अतिथींचे स्वागत केले. या कार्यक्रमाला माजी सैनिक संघटनाचे पुंडलिक बकाने, दिलीप वाघमारे आणि संघटनेचे पदाधिकारी, राष्ट्रवादीचे माजी आमदार राजू तिमांडे, भाजप कार्यकर्ते देवा कुबडे, प्रहारचे धीरज नंदरे, किशोर देवढे, संदीप प्रजापती, प्रवीण चरडे, पडवे सर, अजय ठाकरे, सतीश गलांडे, अमोल वाघमारे, मोहन पेरकुंडे, समीर मानकर,सुमित तेलहांडे,सुधीर मोरेवार, भास्कर सोरटे, अनंता वायसे, रितेश गुडधे, प्रकाश मने, मयूर पुसदेकर, अमोल किनाके सह मोठ्या प्रमाणात हिंगणघाट शहरातील नागरिक उपस्थित होते.

