कारागृहातच कौशल्य विकास केंद् प्रशिक्षण देणारा वर्धा शहर राज्यात पहिला बंदी कारागृहातच प्रशिक्षणार्थ्यांना जिल्हाधिका-यांच्या हस्ते प्रमाणपत्र
प्रविण जगताप, प्रतिनिधी
वर्धा, दि.10:- कारागृहामध्ये विविध गुन्ह्यातील बंदींना ठेवले जाते. यातील काही बंदी न्यायालयाने शिक्षा सुनावलेले तर काही बंदी अंडरट्रायल असतात. या बंदींना कारागृहातून सुटका झाल्यानंतर समाजात आत्मसन्मानाने जगता यावे व त्यासाठी त्यांना हक्काचा स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी वर्धा जिल्हा कारागृहातील तब्बल 130 बंदींना तीन महिन्यांच्या दिर्घ मुदतीचे कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. इतक्या मोठया प्रमाणावर आणि दिर्घ मुदतीचे प्रशिक्षण देणारा वर्धा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.
तत्कालीन जिल्हाधिका-यांच्या पुढाकाराने किमान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. या सर्व बंदी बांधवांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते कारागृहातच बंदी प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिका-यांसह जिल्हा कारागृह अधिक्षक सुहास पवार, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक निता औघड आदी उपस्थित होते.
बंदींना देण्यात आलेल्या प्रशिक्षणामध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर, सेल्फ ऍम्प्लॉईड टेलर, बेसिक आर्क वेल्डींग, ईलेक्ट्रीशियन या चार प्रकारच्या प्रशिक्षणाचा समावेश आहे. हे प्रशिक्षण कौशल्य विकास विभाग व औद्योगिक प्रशिक्षण संस्था वर्धेच्यावतीने देण्यात आले. बंदींना प्रशिक्षण देता यावे म्हणुन कारागृहातच कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात आले होते. या ठिकाणी विषयतज्ञानी प्रत्यक्ष उपस्थित राहून बंदीना प्रशिक्षणाचा लाभ दिला. इतक्या मोठया प्रमाणात आणि दिर्घ मुदतीचे प्रशिक्षण देणारा वर्धा हा राज्यात पहिला जिल्हा ठरला आहे.
कारागृहात उपलब्ध झालेल्या प्रशिक्षणाच्या संधीचा उपयोग बंदी बांधवांनी आपल्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी करावा, असे यावेळी बंदी बांधवांशी संवाद साधतांना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले. कारागृहातील हे प्रशिक्षण पुढेही सुरु राहील, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. या प्रशिक्षणाची राष्ट्रीय स्तरावरील स्कॉच ग्रुपने दखल घेतली असून या प्रकल्पास सेमी फायनलिस्टचे प्रमाणपत्र देखील मिळाले आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त निता औघड यांनी केले. त्यांनी यावेळी कौशल्य विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. कारागृह अधिक्षक श्री पवार यांनी देखील आपले मनोगत व्यक्त् केले. कार्यक्रमाचे संचालन रुपेश रामगडे यांनी केले तर आभार रुपसिंग ठाकूर यांनी मानले. यावेळी प्लॅटीनम इन्स्टीटयूटचे अजित नेरकर यांच्यासह बंदी बांधव उपस्थित होते.